भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला टी-20 सामना मंगळवारी (20 सप्टेंबर) मोहालीमध्ये खेळला गेला. उभय संघातील ही टी-20 मालिका तीन सामन्यांची असून पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर चार गड्यांनी विजय मिळवत मालिकेत आघाडी घेतली. या सामन्यातून भारताचा युवा वेगवान गोलंदाज हर्षल पटेल पुनरागमन करत होता. मात्र, त्याची गोलंदाजी ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी चांगलीच फोडून काढली. याच सोबत त्याच्या नावावर एक नकोसा पराक्रमही नोंदविला गेला.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मायदेशी झालेल्या टी20 मालिकेवेळी हर्षल दुखापतग्रस्त झाला होता. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत वेळ घालवल्यानंतर त्याने आपली तंदुरुस्ती सिद्ध केली. त्यानंतर त्याची ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या मालिकेसाठी तसेच, आगामी टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मोहाली येथे झालेल्या पहिल्या सामन्यात त्याला खेळण्याची संधी मिळाली.
मात्र, हा सामना त्याच्यासाठी विसरण्यासारखा राहिला. आपल्या 4 षटकात त्याने तब्बल 49 धावा मोजल्या. यामध्ये तीन चौकार आणि चार षटकारांचा समावेश होता. ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी त्याने टाकलेल्या 18 व्या षटकात 22 धावांची लयलूट करत सामना आपल्या बाजूने वळविला.
या सामन्यात झालेल्या धुलाईनंतर हर्षलने जसप्रीत बुमराहसोबत बरोबरी केली आहे. मात्र, ती बरोबरी एका लाजिरवाण्या कामगिरीने झाली. जसप्रीत बुमराहने जानेवारी 2016 मध्ये टी20 पदार्पण केल्यापासून 58 सामन्यात 1247 चेंडू टाकले आहेत. यामध्ये त्याच्याविरुद्ध फलंदाजांनी 28 षटकार ठोकलेत. त्याचवेळी हर्षल पटेलने यावर्षी आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये 320 चेंडू टाकत 28 षटकारांचा प्रसाद घेतलाय. यावर्षी भारतासाठी हर्षल व्यतिरिक्त युवा वेगवान गोलंदाज आवेश खान व अष्टपैलू हार्दिक पंड्या हे देखील फारसे महागडे ठरलेत. या दोघांविरोधातही अनुक्रमे 21 व 20 षटकार ठोकले गेलेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
पुन्हा बदलले गेले वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलचे ठिकाण! लॉर्ड्स नव्हेतर या मैदानावर होणार सामना
तीन सामन्यांतील 18 चेंडूत भुवनेश्वरने खर्च केल्यात 49 धावा, माजी दिग्गजाने खूपच सुनावले
तुफान व्हायरल होतेय रोहितची ही’ रिऍक्शन; मात्र नक्की काय घडलेले त्यावेळी?