---Advertisement---

चिराग-सात्विक यांनी रचला इतिहास! वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशीपच्या दुहेरीत कांस्य जिंकणारी ठरली पहिली पुरूष जोडी

Chirag Shetty & Satwik SaiRaj Rankireddy
---Advertisement---

जपानमध्ये खेळल्या जाणाऱ्या वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशीप (BWF World Championships) २०२२च्या स्पर्धेत भारताची स्टार बॅडमिंटन जोडी चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रंकीरेड्डी यांनी इतिहास रचला आहे. त्यांनी शनिवारी (२७ ऑगस्ट) चॅम्पियनशीपच्या पुरूष दुहेरीमध्ये भारताला पहिले पदक पटकावून दिले आहे. मात्र या पदकाचा रंग काहीसा वेगळा असला असता कारण त्यांना उपांत्य फेरीत मलेशियाच्या जोडीकडून पराभूत व्हावे लागले आहे.

चिराग शेट्टी (Chirag Shetty) आणि सात्विक साईराज रंकीरेड्डी (Satwik SaiRaj Rankireddy) यांचे या स्पर्धेतील उपांत्य फेरीपर्यंत चांगले प्रदर्शन राहिले, मात्र उपांत्य फेरीत त्यांना पराभव पत्करावा लागला. यामुळे त्यांना कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. त्यांचा उपांत्य फेरीत मलेशियन जोडी ऍरोन चिया आणि सोह वुई यिक यांनी २०-२२, २१-१८, २१-१६ असा पराभव केला आहे.

पराभव झाला असला तरी भारताच्या या स्टार शटलर जोडीने वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशीपमध्ये मोठा पराक्रम केला आहे. चिराग आणि सात्विक या चॅम्पियनशीपच्या पुरूष दुहेरीत कांस्य पदक जिंकणारी पहिलीच भारतीय पुरूष जोडी ठरली आहे.

विजयाने सुरूवात, मात्र शेवटच्या दोन सामन्यात पराभव
चिराग-सात्विक यांनी त्यांच्या कामगिरीत सातत्य राखत उत्तम खेळ केला आहे. नुकतेच या जोडीने बर्मिंघम येथे झालेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्ण पदक जिंकले होते. आता या भारतीय जोडीकडून पुन्हा एकदा सुवर्णपदकाची आशा होती, मात्र त्यांना उपांत्य फेरीत पराभवाचा सामना करावा लागला.

चिराग-सात्विकने मलेशियाच्या जोडीविरुद्ध चांगली सुरूवात केली होती. त्यांनी पहिला सेट २२-२० असा जिंकला. दुसरा सेट अधिक रोमांचक राहिला, ज्यामध्ये भारताच्या जोडीला १८-२१ असा कमी फरकाने गमवावा लागला. तिसरा सेटही बरोबरीत चालला होता, मात्र मलेशियन जोडीने त्यांचा खेळ उंचावत सेटमध्ये आघाडी घेतली. त्यामुळे चिराग-सात्विकला अंतिम निर्णायक सेट १६-२१ असा गमवावा लागला.

चॅम्पियनशीपमध्ये भारताचे हे १३वे पदक
वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशीपच्या इतिहासात भारताचे हे १३वे पदक असणार आहे. आतापर्यंत भारताच्या स्टार बॅडमिंटनपटूंनी या चॅम्पियनशीपमध्ये १२ पदके जिंकली आहेत. पहिले पदक प्रकाश पदुकोण यांनी जिंकून दिले होते. त्यांनी १९८३मध्ये डेन्मार्क येथे झालेल्या चॅम्पियनशीपमध्ये एकेरीत त्यांनी कांस्य पदक जिंकले होते.

तसेच दुहेरीत (महिला-पुरूष) हे भारताचे दुसरे पदक आहे. याआधी २०११मध्ये भारताने महिला दुहेरीत कांस्य पदक जिंकले होते. हे पदक ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पोनप्पा यांनी जिंकून दिले होते.

भारताच्या नावावर या चॅम्पियनशीपमध्ये एकच सुवर्ण पदक आहे. हे पदक २०१९मध्ये पीव्ही सिंधू (PVSindhu) हीने जिंकून दिले होते. २०११नंतर भारतासाठी हा हंगाम सर्वात यशस्वी ठरला आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जिंकलस! ‘लोखंडी भिंत’ही नाही रोखू शकली रोहितचं चाहत्यांवरील प्रेम, पाकिस्तानी फॅनला मारली मिठी
जेव्हा ‘विक्रमादित्य ब्रॅडमन’ यांनी अवघ्या ३ षटकात झळकावले होते शतक
सर डॉन ब्रॅडमन यांच्या फलंदाजीचा ७३ वर्षे जूना रंगीत व्हिडिओ पाहिलाय का?

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---