उद्यापासून(3 नोव्हेंबर) भारत विरुद्ध बांगलादेश(India vs Bangladesh) संघात 3 सामन्यांची द्विपक्षीय टी20 मालिका(T20I Series) सुरु होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना उद्या दिल्लीमध्ये खेळला जाणार आहे. यानंतर दुसरा सामना 7 नोव्हेंबरला राजकोट आणि तिसरा सामना 10 नोव्हेंबरला नागपुरमध्ये होणार आहे.
विशेष म्हणजे भारतीय संघ बांगलादेश विरुद्ध मायदेशात पहिल्यांदाच टी20 ची द्विपक्षीय मलिका(bilateral T20I series) खेळणार आहे. याआधी या दोन्ही संघात द्विपक्षीय टी20 मालिका झाली नव्हती.
तसेच बांगलादेशचा संघ तब्बल 32 महिन्यानंतर भारतात क्रिकेट मालिका खेळण्यासाठी आला आहे. याआधी बांगलादेशने भारतात फेब्रुवारी 2017मध्ये शेवटचे कसोटी मालिका खेळली होती. या कसोटी मालिकेत भारताने 1-0 ने विजय मिळवला होता.
भारत आणि बांगलादेश संघात आत्तापर्यंत 8 टी20 सामने खेळण्यात आले आहेत. हे सर्व सामने भारतीय संघाने जिंकले आहेत. तसेच मायदेशात भारताने बांगलादेश विरुद्ध केवळ 1 टी20 सामना खेळला आहे. हा सामना 23 मार्च 2016 ला टी20 विश्वचषकादरम्यान साखळी फेरीत झाला होता. या सामन्यात भारताने 1 धावेने विजय मिळवला होता.
या दोन संघात शेवटचा टी20 सामना 18 मार्च 2018 ला झाला होता. या सामन्यात भारताने 4 विकेटने विजय मिळवला होता.
उद्यापासून भारत-बांगलादेश संघात सुरु होणाऱ्या या टी20 मालिकेसाठी भारताचा नियमित कर्णधार विराट कोहलीला(Virat Kohli) विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे या मालिकेत रोहित शर्मा(Rohit Sharma) भारताचे नेतृत्व करणार आहे.






