सोमवारी बांगलादेश सरकारच्या क्रीडा सल्लागारांनी दावा केला होता की, बांगलादेशी खेळाडूंना भारताच्या भूमीवर खेळताना धोका असल्याचे आयसीसीनेही मान्य केले आहे. मात्र, आयसीसीने आता बांगलादेशचा हा खोटा दावा उघड करत त्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.
आयसीसीने स्पष्ट केले आहे की, भारतात बांगलादेशी खेळाडूंच्या सुरक्षेबाबत काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) नुकतेच आयसीसीला पत्र लिहून सुरक्षेचे कारण देत आपले विश्वचषकातील सामने भारतातून दुसऱ्या देशात हलवण्याची विनंती केली होती.
भारतात आलेल्या आयसीसीच्या सुरक्षा पथकाने 2026 टी-20 वर्ल्ड कपच्या सुरक्षा व्यवस्थेचा पूर्ण आढावा घेतला. रिपोर्ट्सनुसार, या पथकाने तपासणीनंतर सांगितले की, भारतात बांगलादेशी खेळाडूंना कोणताही धोका नाही. याचा अर्थ असा की, 2026 च्या विश्वचषकात बांगलादेशला आधीच ठरलेल्या मैदानांवरच आपले सामने खेळावे लागतील. आयसीसीने त्या सर्व अफवा फेटाळून लावल्या आहेत, ज्यामध्ये असे म्हटले जात होते की आयसीसी सुरक्षेच्या कारणास्तव खेळाडूंना निवडण्याबाबत किंवा बाहेर काढण्याबाबत सुचवत आहे. आयसीसीने बीसीसीआयवर पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे.
बांगलादेशमध्ये हिंदूवर होणाऱ्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर, भारतात बांगलादेशी खेळाडू मुस्तफिजुर रहमानला आयपीएलमधून बाहेर काढण्याची मागणी होत होती. त्यानंतर बीसीसीआयने कोलकाता नाईट रायडर्सला (KKR) मुस्तफिजुरला संघातून बाहेर करण्यास सांगितले. मुस्तफिजुरला बाहेर काढण्याच्या निर्णयामुळे बांगलादेश क्रिकेट बोर्ड प्रचंड संतापले. त्यांनी तात्काळ आयसीसीला पत्र लिहून 2026 टी-20 वर्ल्ड कपचे ठिकाण बदलण्याची मागणी केली आणि भारतीय भूमीवर आपल्या खेळाडूंना धोका असल्याचे म्हटले. मात्र, आता आयसीसीने ही मागणी पूर्णपणे फेटाळली आहे.






