एकदाचे काय ते आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामना खेळला जाणार आहे. १५ फेब्रुवारीला खेळल्या जाणाऱ्या या सामन्याआधी पाकिस्तानने बरीच नाटके केली होती. बांग्लादेशला समर्थन दर्शवण्यासाठी पाकिस्तानने भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकला होता. आता ते खेळण्यास तयार झाले असून त्यांच्या माजी क्रिकेटपटूने खेळपट्टीबाबत शंका व्यक्त केली आहे.
पाकिस्तानचा दिग्गज फिरकीपटू सक्लेन मुश्ताक यांनी श्रीलंकेच्या खेळपट्टीवर छेडछाड केली जाऊ शकते, असे विधान केले आहे. यावेळी त्यांनी भारतीय क्रिकेट बोर्डचे नाव नाही घेतले, मात्र त्यांचा थेट निशाना बीसीसीआयवरच होता. कारण पाकिस्तानने अनेकदा आयसीसी भारतीय बोर्डशी प्रभावित असल्याचा आरोप केला आहे.
मुश्ताक यांनी ‘शो गेम ऑन’मध्ये म्हटले, “आजकाल टेक्नॉलॉजीमुळे आणि ग्राऊंडच्या स्टाफमुळे खेळपट्टी बदलली जाऊ शकते, त्याचे तुम्हालाही कळणार नाही. आम्हाला मात्र माहित आहे, आयसीसीवर कोणाचा प्रभाव आहे ते.”
पाकिस्तानने यूएसएविरुद्ध जिंकल्याबाबत मुश्ताक यांना कोलंबोमध्ये भारताविरुद्धच्या सामन्यात कशी खेळपट्टी असेल असे विचारले गेले. तेव्हा त्यांनी खेळपट्टीसोबत छेडछाड केली जाऊ शकते, असे विधान केले. तसेच त्यांनी या सामन्यासाठी अंतिम अकरा खेळाडूंची निवड विचार करून करावी लागेल, असेही म्हटले.
भारताविरुद्धच्या सामन्यासाठी पाकिस्तानचे अंतिम अकरा खेळाडू कोण असतील? यावर बोलताना मुश्ताक म्हणाले, “भारताविरुद्ध त्याचा आत्मविश्वास वाढावा यासाठी तुम्ही पहिल्या सामन्यात उस्मान तारिकला खेळवले, मात्र तुम्हाला दोन वेगवान गोलंदाज आणि एक अष्टपैलूसोबत खेळायचे असेल तर सर्व काही बदलेल. जिमी नीशमलाच पाहा तो आमच्या फहीम अशरफसारखा आहे.”
“तो कधी एक षटक टाकतो, तर कधी २०वे. पाकिस्तानसाठी २०वे षटक कोण टाकेल? तारिक, नवाज, शादाब की अबरार? यांनी कधी असे केले आहे. फहीम योग्य निवड आहे मग चांगले होऊ दे किंवा वाईट,” असेही मुश्ताक यांनी पुढे म्हटले आहे. यूएसएविरुद्ध जिंकल्यावर साहिबजादा फरहान यानेही भारताला आव्हान करताना म्हटले, “आम्ही संयमाने मात्र आक्रमक क्रिकेट खेळू. “
फरहान यूएसएविरुद्धच्या सामन्यात स्फोटक खेळी करत ‘प्लेयर ऑफ दी मॅच’चा मानकरी ठरला होता. सर्वांनाच भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याची प्रतिक्षा आहे. हा सामना कोलंबोच्या आर प्रेमदासा आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाणार आहे.
या स्पर्धेत पाकिस्तानने त्यांचे पहिले दोन्ही सामने जिंकले आहेत. यामुळे ते ग्रुप एच्या अंकतालिकेत अव्वल स्थानावर आहेत. भारताने एकच सामना खेळला असून त्यांचा दुसरा सामना नामिबियाविरुद्ध आज म्हणजे १२ फेब्रुवारीला आहे.






