पाकिस्तान सरकारने पीसीबीला (PCB) असा आदेश जारी केला आहे की, त्यांनी टी-२० विश्वचषकात भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकावा. सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती समोर आली आहे. आतापर्यंत याप्रकरणी आयसीसीकडून (ICC) कोणतेही कठोर पाऊल उचलण्यात आलेले नाही, परंतु आगामी ४८ तास या मुद्द्यावर अत्यंत महत्त्वाचे ठरू शकतात. दरम्यान, या प्रकरणात आता आयसीसीचे माजी अध्यक्ष एहसान मनी यांनी एक मोठे विधान केले आहे.
त्यांच्या मते, आयसीसी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे काहीही वाकडे करू शकत नाही. या विषयावर भाष्य करताना ते म्हणाले की, जर पाकिस्तान आपल्या सरकारच्या आदेशांचे पालन करत असेल, तर त्यांच्यावर कोणतीही बंदी घातली जाऊ शकत नाही. याच आधारावर भारताने देखील चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानमध्ये न जाण्याचा निर्णय घेतला होता. तुम्ही या बाबतीत दुटप्पी भूमिका (Double Standards) घेऊ शकत नाही. ही समस्या सोडवण्याऐवजी आयसीसी केवळ प्रेक्षकाची भूमिका घेऊन तमाशा पाहत आहे.






