30 मेपासून विश्वचषक 2019 ची स्पर्धा इंग्लंड आणि वेल्समध्ये रंगणार आहे. त्यामुळे आता जेमतेम दिड महिन्याचाच कालावधी राहिलेल्या या विश्वचषकासाठी सर्व संघांनी एकएक करत संघ घोषित करायला सुरुवात केली आहे. 23 एप्रिल ही 15 जणांचा संघ घोषित करण्याची अंतिम तारीख आहे.
या विश्वचषकासाठी 15 एप्रिलला मुंबईत भारतीय संघाची घोषणा केली जाणार आहे. विशेष म्हणजे 15 एप्रिलला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामना मुंबईमध्ये वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.
त्यामुळे भारतीय संघाचा आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा कर्णधार विराट कोहलीही अंतिम संघाची निवड करताना निवड समीतीबरोबर उपस्थित असण्याची दाट शक्यता आहे.
विश्वचषकासाठी निवडण्यात येणाऱ्या संघाबद्दल बोलताना भारतीय संघाचा उपकर्णधार रोहित शर्माने आधीच स्पष्ट केले आहे की संघ जवळ जवळ निश्चित आहे. फक्त काही स्थानांसाठी स्पर्धा असणार आहे. त्याचबरोबर भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री आणि कर्णधार विराट यांची मतेही संघ निवडताना विचारात घेतली जाणार आहेत.
भारतीय संघाला सध्या चौथ्या क्रमांकाचा प्रश्न सतावत आहे. भारताने या क्रमांकावर अनेक प्रयोग करुन पाहिले आहेत. त्यामुळे आता चौथ्या क्रमांकासाठी कोणाला संघात स्थान मिळणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
या विश्वचषकासाठी सर्वात प्रथम न्यूझीलंडने 15 खेळाडूंच्या संघाची घोषणा केली आहे. तसेच पाकिस्तान आणि अफगाणिस्तानने 23 खेळाडूंचा संभाव्य संघ घोषित केला आहे.
या विश्वचषकात भारताचा पहिला सामना 5 जूनला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे.






