आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा २०२१-२३ मध्ये श्रीलंकेने वेस्ट इंडिजविरुद्ध १८७ धावांनी मोठा विजय नोंदवला आहे. यजमान श्रीलंकेने घरच्या मैदानावर वेस्ट इंडिज संघाला सुरुवातीपासूनच दडपणाखाली ठेवले आणि दणदणीत विजयाची नोंद केली. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेमधील श्रीलंकेचा हा पहिला सामना होता आणि आता गुणांच्या १००% टक्केवारीनुसार ते गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचले आहेत. यासोबतच भारत दुसऱ्या क्रमांकावर घसरला आहे.
भारतीय संघाने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धे अंतर्गत आतापर्यंत एकूण ४ कसोटी सामने खेळले आहेत. त्यापैकी दोन जिंकले आहेत आणि एक सामना गमावला आहे, तर एक कसोटी अनिर्णित राहिली आहे. इंग्लंड दौऱ्यावर भारताने हे ४ कसोटी सामने खेळले होते. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील २ सामन्यांची कसोटी मालिका देखील जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा भाग आहे. भारतीय संघाने कानपूरमधील पहिली कसोटी जिंकली तरी गुणतालिकेत श्रीलंकेला तूर्तास मागे सोडता येणार नाही.
तत्पूर्वी, सामन्यात कर्णधार दिमुथ करुणारत्नेच्या शानदार १४७ धावांच्या जोरावर श्रीलंकेने गॉल कसोटीत वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या डावात ३८६ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजचा संघ पहिल्या डावात केवळ २३० धावाच करू शकला. श्रीलंकेने दुसरा डाव ४ बाद १९१ धावांवर घोषित केला. करुणारत्नेने दुसऱ्या डावात ८३ धावांचे योगदान दिले. दुसऱ्या डावात वेस्ट इंडिजचा डाव १६० धावांत आटोपला. करुणारत्नेला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.
आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत गुणांच्या टक्केवारीनुसार संघाची क्रमवारी निश्चित केली जाईल. विजयासाठी १२ गुण, बरोबरीत सुटलेल्या सामन्यासाठी ६ गुण, अनिर्णित सामन्यासाठी ४ गुण आणि पराभवासाठी कोणतेही गुण नाहीत. यासोबतच टक्के गुण यासाठी देखील नियमावली असेल ज्यात एखादा जिंकल्यावर १०० टक्के गुण, बरोबरी झाल्यास ५० टक्के गुण, सामना अनिर्णित राहिल्यास ३३.३३ टक्के गुण आणि सामना गमावल्यावर ० टक्के गुण मिळतील.
महत्त्वाच्या बातम्या-
धुआं-धुआं था वो समा… धुक्याने भरलेल्या कानपूर स्टेडियमला पाहून जाफरला सुचली मस्ती, शेअर केले मीम
द्रविडला गोष्टी बदललेल्या आवडत नाही म्हणतात, तेच खरे! संघाच्या जुन्या प्रथेची पुन्हा केली सुरुवात