2026 च्या आयसीसी टी-20 वर्ल्ड कपचे यजमानपद भारत आणि श्रीलंका (India and Shrilanka) संयुक्तपणे भूषवत आहेत. 7 फेब्रुवारीपासून या स्पर्धेला सुरुवात होत आहे. या मोठ्या स्पर्धेपूर्वी बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) आपले सर्व सामने भारतातून दुसऱ्या देशात हलवण्याची मागणी केली होती. या विषयावर 21 जानेवारी रोजी आयसीसी आणि बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या प्रतिनिधींमध्ये बैठक झाली, ज्यामध्ये आयसीसीने आपला निर्णय सुनावला आहे.
रिपोर्टनुसार, आयसीसीने बांगलादेश बोर्डाला स्पष्ट निर्देश दिले आहेत की, त्यांनी आपल्या सरकारला परिस्थितीची कल्पना द्यावी. जर बांगलादेशने टी-20 वर्ल्ड कपसाठी भारतात येण्यास नकार दिला, तर त्यांच्या जागी दुसऱ्या संघाला प्रवेश दिला जाईल. या बैठकीत झालेल्या मतदानामध्ये बहुतांश सदस्यांनी बांगलादेशच्या जागी दुसऱ्या संघाला सहभागी करून घेण्याच्या बाजूने कौल दिला आहे. आयसीसीने बीसीबीला अंतिम निर्णयासाठी आणखी एक दिवसाचा वेळ दिला आहे.
असे मानले जात आहे की, जर बांगलादेशने भारतात खेळण्यास अधिकृतपणे नकार दिला, तर त्यांच्या जागी स्कॉटलंड संघाची वर्ल्ड कपमध्ये एन्ट्री होईल.






