ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात रविचंद्रन अश्विन जबरदस्त लयीत दिसला. उभय संघांतील हा कसोटी सामना नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला गेला. फिरकी गोलंदाजांच्या अप्रतिम प्रदर्शनाच्या जोरावर भारताने हा सामना 132 धावांनी जिंकला. दुसऱ्या डावात अश्विनच्या फिरकी चेंडूच्या जाळ्यात पाहुणा ऑस्ट्रेलिया संघ पुरेपूर अडकला आणि अवघ्या 91 धावांवर गुंडाळला गेला. अश्विन या सामन्याप्रमाणेच संघासाठी नेहमीच मॅच विनर ठरला आहे. त्याच्या एका जबरदस्त आकडेवारीवरून ही गोष्ट सिद्ध होते.
भारतीय संघाने जिंकलेल्या सामन्यांमध्ये रविचंद्रन अश्विनच्या नावावर इतरांच्या तुलनेत सर्वाधिक विकेट्स आहेत. अश्विनने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या नागपूर कसोटीत पहिल्या डावात तीन, तर दुसऱ्या डावात पाच विकेट्स घेतल्या. त्याने या सामन्यातील एकूण 8 विकेट्सच्या जोरावर हा मोठा विक्रम नावावर केला. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात भारताने जिंकलेल्या 161 सामन्यांमध्ये रविचंद्रन अश्विन खेळला. हे सामने जिंकण्यासाठी अश्विनचे योगदान महत्वाचे राहिले. त्याने या सामन्यांमध्ये एकूण 489 विकेट्स घेतल्या. विजयी सामन्यांमध्ये भारतासाठी सर्वाधिक विकेट्स घेण्याची कामगिरी यापूर्वी माजी दिग्गज अनिल कुंबळे यांच्या नावावर होती. अनिल कुंबळेंनी जिंकलेल्या सामन्यांमध्ये 486 विकेट्स घेतल्या होत्या.
शनिवारी (11 फेब्रुवारी) अश्विनने या खास यादीत कुंबळेंना पछाडले. यादीत तिसरा क्रमांकल हरभजन सिंग याचा आहे, ज्याने भारतासाठी जिंकलेल्या सामन्यांमध्ये 406 विकेट्स घेतल्या आहेत. चौथ्या क्रमांकावर 366 विकेट्ससह रविंद्र जडेजा आहे. माजी दिग्गज वेगवान गोलंदाज झहीर खान आहे. झहीरने संघासाठी जिंकलेल्या 160 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 349 विकेट्स घेतल्या होत्या.
भारताने जिंकलेल्या सामन्यांमध्ये सर्वाधिक विकेट्सचे योगदान देणारे खेळाडू
489 विकेट्स – रविचंद्रन अश्विन*
486 विकेट्स – अनिल कुंबळे
406 विकेट्स – हरभजन सिंग
366 विकेट्स – रविंद्र जडेजा
349 विकेट्स – झहीर खान
नागपूर कसोटीचा एकंदरीत विचार केला, तर भारतासाठी विजय खूपच सोपा राहिला. पहिल्या डावापेक्षा दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाला सर्वबाद करणे भारतासाठी सोपे राहिले. पहिल्या डावात ऑस्ट्रेलिया 177 धावांवर सर्वबाद जाला होता. पण दुसऱ्या डावात त्यांना 100 धावांचा टप्पाही पार करता आला नाही. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलिया अवघ्या 91 धावांवर सर्वबाद झाला. असे असले तरी त्यांचा फिरकीपटू टॉड मर्फी याने नागपूरच्या खेळपट्टीचा पुरेपूर फायदा घेतला. मर्फीने कारकिर्दीतील या पहिल्याच कसोटी सामन्यात 7 विकेट्स घेतल्या. दुसरीकडे भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने पहिल्या डावात चांगली सुरुवात दिल्यामुळे संघ पुढे विजयाकडे वाटचाल करू शकला. रोहितने 212 चेंडूत 120 धावा केल्या. (IND vs AUS 1st Test Ravi Ashwin now has most Wickets for India in Wins)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ब्रेकिंग! सामनावीर ठरेलेल्या रविंद्र जडेजावरच आयसीसीची मोठी कारवाई, बसला आर्थिक नुकसानीचा फटका
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत अश्विनचे विक्रमी ‘शतक’, यादीत ‘हा’ भारतीयच अव्वलस्थानी