बांग्लादेशविरुद्धच्या मालिकेतील तिसऱ्या टी20 सामन्यात भारताने 297 धावा केल्या होत्या. टी20 क्रिकेटच्या इतिहासातील ही दुसरी सर्वोच्च धावसंख्या आहे. संजू सॅमसनने 40 चेंडूत शतक पूर्ण करण्यापासून ते डावात एकूण 22 षटकार ठोकण्यापर्यंत अनेक मोठे विक्रम टीम इंडियाने या सामन्यात केले. याशिवाय भारताने आपला सर्वोच्च पॉवरप्ले स्कोअर केला. त्याचसोबत सर्वात जलद 100 धावा करण्याचा विक्रमही केला आहे.
टी20 मध्ये सर्वात जलद 100 धावा – भारताने बांगलादेशविरुद्ध 100 धावांचा टप्पा अवघ्या 7.1 षटकात पार केला. भारताने आपल्या मागील विक्रमात सुधारणा केली. यापूर्वी 2019 मध्ये टीम इंडियाने 8 षटकात 100 धावा करण्याचा विक्रम केला होता.
पहिल्या 10 षटकांमध्ये सर्वाधिक धावसंख्या – टी-20 सामन्याच्या पहिल्या 10 षटकांमध्ये सर्वाधिक धावसंख्येच्या बाबतीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. टीम इंडियाने बांग्लादेशविरुद्ध 10 षटकांत 1 गडी गमावून 152 धावा केल्या. आता या यादीत भारताच्या पुढे फक्त ऑस्ट्रेलिया आहे. ज्यांनी स्कॉटलंडविरुद्ध 10 षटकात 156 धावा केल्या आहेत.
सर्वात जलद 200 धावा – टी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 200 धावा करण्याच्या बाबतीतही टीम इंडिया दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारताने हा आकडा 84 चेंडूंत म्हणजे 14 षटकांत गाठला. पण दक्षिण आफ्रिकेने गेल्या वर्षी वेस्ट इंडिजविरुद्ध 13.5 षटकांत 200 धावांचा आकडा गाठला होता.
पॉवरप्लेमध्ये सुधारला विक्रम – टी-20 क्रिकेटमध्ये भारताने आपला पॉवरप्ले स्कोअर सुधारला आहे. टीम इंडियाने बांग्लादेशविरुद्ध 6 षटकात एक विकेट गमावून 82 धावा केल्या. यापूर्वी स्कॉटलंडविरुद्धही भारताने 6 षटकांत 2 गडी गमावून 82 धावा केल्या होत्या.
रेकॉर्डच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास हा सामना भारतासाठी संस्मरणीय ठरला. थोडक्यात सांगायचे झाले तर, भारत आता टी20 क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा दुसरा देश बनला आहे. टीम इंडियाने 297 धावा केल्या आणि सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत आता फक्त नेपाळ त्यांच्या पुढे आहे. ज्याने मंगोलियाविरुद्ध 314 धावा केल्या होत्या.
तर संजू सॅमसन आता भारतासाठी टी20 सामन्यात दुसरे सर्वात जलद शतक ठोकणारा खेळाडू ठरला आहे. त्याने 40 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. आत्तापर्यंत, टी20 मध्ये सर्वात जलद शतक झळकावण्याचा भारतीय विक्रम रोहित शर्माच्या नावावर आहे. ज्याने 2017 मध्ये श्रीलंकेविरुद्ध 35 चेंडूत शतक झळकावले होते.
हेही वाचा-
सूर्याचे टी20 मध्ये 2500 धावा पूर्ण, कोहलीनंतर अशी कामगिरी करणारा केवळ दुसरा
IND vs BAN; तिसऱ्या सामन्यात का झाले नाही ‘या’ खेळाडूचे पदार्पण? KKR खूश कारण काय?
IND vs BAN T20: कोण ठरला सामनावीर आणि कोणाला मिळाली मालिकावीर ट्रॉफी, जाणून घ्या