नशीब त्यांच्याच पाठीशी राहते जे आपल्या इराद्यांवर ठाम राहतात. ही ओळ कसोटी क्रिकेटमध्ये परतलेला करुण नायरवर अगदी तंतोतंत लागू पडली आहे. तब्बल नऊ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर करुण नायरने कसोटी क्रिकेटमध्ये दमदार पुनरागमन करत इंग्लंडविरुद्ध ओव्हल कसोटीत अर्धशतक झळकावत टीम इंडियाला मोठा आधार दिला आहे.
इंग्लंड दौऱ्यावर तिसऱ्या कसोटीनंतर नायरच्या करिअरला पूर्णविराम लागेल असं अनेकांना वाटलं होतं. पहिल्या तीन सामन्यांत त्याला संधी मिळाली पण तो मोठी खेळ करण्यात अपयशी ठरला. त्यामुळे मँचेस्टर कसोटीत त्याला संघातून वगळण्यात आलं. मात्र चौथ्या कसोटीत रिषभ पंत जखमी झाल्यानंतर पाचव्या कसोटीत नायरला पुन्हा संधी मिळाली आणि त्याने ती संधी दोन्ही हातांनी खेचून घेतली.
ढगाळ हवामान आणि ओव्हलच्या हिरवट पिचवर इंग्लंडच्या गोलंदाजांनी तडाखेबाज सुरुवात केली. पहिल्या सत्रातच भारताने महत्त्वाचे गडी गमावले. टॉस हरून प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघ 204 धावांवर 6 बाद झाला. पण या संकटसमयी करुण नायर डगमगला नाही. त्याने शांत डोक्याने गोलंदाजांना तोंड देत एक-एक धाव जमवत अर्धशतक पूर्ण केलं. पहिल्या दिवसाच्या अखेरीस तो 52 धावांवर नाबाद आहे.
– Scored Triple Hundred in 2016.
— Tanuj (@ImTanujSingh) July 31, 2025
– Now Test Fifty came in 2025.
KARUN NAIR SCORED A TEST FIFTY AFTER 3150 DAYS 🤯🥶 pic.twitter.com/HAqPKbu4GK
करुण नायरचं हे अर्धशतक खास आहे कारण 3149 दिवसांनी त्याने पुन्हा कसोटीत 50 धावांचा टप्पा गाठला आहे. याआधी डिसेंबर 2016 मध्ये इंग्लंडविरुद्ध त्याने ऐतिहासिक तिहेरी शतक (303 नाबाद) ठोकलं होतं. इतक्या मोठ्या अंतरानंतर अर्धशतक झळकावणारा तो केवळ दुसरा भारतीय ठरला आहे.
भारताच्या कसोटी इतिहासातील सर्वात मोठ्या अंतराचा विक्रम पार्थिव पटेलकडे आहे. पार्थिवच्या चौथ्या अर्धशतक (ऑक्टोबर 2004, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 54) आणि पाचव्या अर्धशतक (नोव्हेंबर 2016, इंग्लंडविरुद्ध 67*) यामध्ये तब्बल 4426 दिवसांचं अंतर होतं.
करुण नायरने आपल्या खेळीने पुन्हा एकदा सिद्ध केलं की कसोटी क्रिकेटमध्ये चिकाटी, संयम आणि जिद्द या गुणांपेक्षा मोठं शस्त्र नाही. आता पाहावं लागेल की दुसऱ्या दिवसाच्या खेळात तो आपली खेळी कितपत मोठी करतो. भारतीय संघाला मोठ्या धावसंख्येसाठी नायरकडून आणखी एका दीर्घ खेळीची अपेक्षा असेल.






