भारताचा उदयोन्मुख डावखुरा फलंदाज साई सुदर्शनला काउंटी क्रिकेटमधून मिळालेला अनुभव आता कसोटी क्रिकेटमध्ये कामी येणार आहे, असा विश्वास त्याने व्यक्त केला आहे. इंग्लंडविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेपूर्वी सुदर्शनने रेड-बॉल क्रिकेटकडे लक्ष केंद्रीत केले असून, त्याच्या मते “मूलभूत गोष्टीच” फलंदाजीचा खरा पाया आहेत.
गुजरात टायटन्ससाठी आयपीएल 2025 हंगामात साई सुदर्शनने प्रभावी कामगिरी करत 54.21 च्या सरासरीने 759 धावा केल्या. मात्र, शुक्रवारी रात्री मुंबई इंडियन्सविरुद्ध एलिमिनेटरमध्ये पराभव पत्करल्यानंतर त्याचे लक्ष आता कसोटी खेळाकडे वळले आहे.
यावेळी बोलताना सुदर्शनने सांगितले, “मी काउंटी क्रिकेटमध्ये सात सामने खेळलो असून त्याचा मला चांगला अनुभव मिळाला. माझ्या फलंदाजीत तंत्र आणि मूलभूत गोष्टींच्या दृष्टीने अनेक पटीने सुधारणा झाली आहे. त्यामुळे, कसोटी क्रिकेटमध्ये या बाबी निश्चितच उपयोगी पडतील.”
भारतीय कसोटी संघ 6 जून रोजी इंग्लंडला रवाना होणार असून, त्याआधी साई सुदर्शन ‘भारत अ’ संघाकडून नॉर्थम्प्टन येथे दुसऱ्या सामन्यात सहभागी होईल की नाही, याबाबत अजूनही अनिश्चितता आहे. सुदर्शनचे कसोटी पदार्पण अद्याप व्हायचे आहे. या दाैऱ्यावर भारतीय संघाला 5 कसोटी सामने खेळायचे आहेत. ज्याची सुरुवात 20 जूनपासून होणार आहे.
“मर्यादित षटकांच्या क्रिकेटनंतर रेड-बॉल क्रिकेटमध्ये सराव करताना काही बदल आवश्यक असतात. पण मालिकेपूर्वी मला तयारीसाठी पुरेसा वेळ मिळणार आहे,” असे त्याने पीटीआयला दिलेल्या प्रतिक्रियेत सांगितले, सुदर्शनच्या फलंदाजीत सुस्पष्टता आणि गांभीर्य दिसून येत असून, आगामी इंग्लंड दौऱ्यात त्याच्या कसोटी पदार्पणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.