भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची टेस्ट मालिका संपली आहे. केनिंग्टन ओव्हलवर झालेल्या शेवटच्या टेस्ट सामन्यात भारताने इंग्लंडचा 6 धावांनी पराभव केला. या विजयासह भारताने ही मालिका 2-2 अशी बरोबरीत संपवली.
पाचवा टेस्ट सामना जिंकल्यानंतर कर्णधार शुबमन गिल म्हणाला की, “जेव्हा तुमच्याकडे प्रसिद्ध कृष्णा आणि मोहम्मद सिराजसारखे गोलंदाज असतात, तेव्हा कर्णधारपद निभावणं सोपं होतं.” गिलने सांगितले की, त्याला या मालिकेच्या निकालाबद्दल समाधान आहे. या मालिकेत सर्वाधिक 754 धावा करणाऱ्या शुबमन गिलला मालिकेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू (man of the series) म्हणून गौरवण्यात आले.
भारतीय टेस्ट कर्णधार शुबमन गिल म्हणाला की, दोन्ही संघांनी संपूर्ण मालिकेत जबरदस्त क्रिकेट खेळलं. दोन्ही संघ आपापल्या अ-गेमसह मैदानात उतरले होते आणि आज आपण विजयी बाजूला आहोत, याचा आनंद आहे.
जेव्हा तुमच्याकडे सिराज आणि प्रसिद्धसारखे गोलंदाज असतात, तेव्हा कर्णधारपद निभावणं खूप सोपं होतं. पुढे गिल म्हणाला, “हो, आमच्यावर खूप मोठा दबाव होता, पण त्यांनी अफलातून गोलंदाजी करत सामना आपल्या बाजूने फिरवला.”
जेव्हा भारतीय कर्णधार शुबमन गिलला विचारण्यात आलं की, या सहा आठवड्यांच्या मालिकेदरम्यान तू काय शिकलास, तेव्हा गिलने उत्तर दिलं. “कधीही हार मानू नये (Never Give Up).”
भारतीय संघाने पाचवा टेस्ट सामना अशा वेळी जिंकला, जेव्हा टीम इंडियाच्या विजयाची शक्यता खूप कमी वाटत होती. सामन्याच्या पाचव्या दिवशी इंग्लंडला विजयासाठी फक्त 35 धावांची गरज होती आणि भारताला 4 विकेट्स हव्याच होत्या. अशा स्थितीत भारताने इंग्लंडला केवळ 6 धावांनी पराभूत केलं.
टीम इंडियाने शेवटपर्यंत विजयाची आशा जपली आणि अखेरीस हा सामना जिंकून मालिका 2-2 अशी बरोबरीत ठेवली.






