बेंगळुरू कसोटीत टीम इंडियाचा 8 गडी राखून पराभव करून न्यूझीलंडने तीन सामन्यांच्या मालिकेत केवळ 1-0 अशी आघाडीच घेतली नाही तर, 1988 नंतर भारतात पहिला विजयही नोंदवला. किवी संघाने शेवटचा 24 नोव्हेंबर 1988 रोजी भारतात भारताचा पराभव केला होता. यानंतर संघाने 10 कसोटी गमावल्या आणि 9 सामने अनिर्णित राहिले. 19 सामन्यांनंतर न्यूझीलंडने भारतात पुन्हा एकदा विजय मिळवला आहे. त्याचबरोबर भारतीय भूमीवर 37 सामन्यांमध्ये टीम इंडियाविरुद्ध न्यूझीलंडचा हा केवळ तिसरा विजय आहे. 2024 आणि 1988 पूर्वी, संघाने 1969 मध्ये पहिली कसोटी जिंकली होती.
बंगळुरू कसोटीत भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिला दिवस पावसाने रद्द होऊनही रोहितचा हा निर्णय क्रिकेटपंडितांच्या समजण्यापलीकडचा होता. रोहितच्या या चुकीच्या निर्णयाचा फटका भारताला सहन करावा लागला. टीम इंडिया केवळ 46 धावांवरच गडगडली. मायदेशात कसोटी क्रिकेटच्या इतिहासात भारताची ही सर्वात कमी धावसंख्या होती.
न्यूझीलंडने टीम इंडियाला इतक्या कमी धावसंख्येवर रोखत पहिल्या डावात 402 धावा केल्या आणि 356 धावांची आघाडी घेतली. किवी संघाकडून डेव्हॉन कॉनवेने 91 धावा केल्या तर रचिन रवींद्रने शतकी खेळी करत 134 धावा केल्या. यादरम्यान रचिनने माजी कर्णधार टीम साऊदीसोबत 8व्या विकेटसाठी 137 धावांची भागीदारी केली. जी टीम इंडियाला खूप जड ठरली. सौदीने या काळात 65 धावांची शानदार खेळी केली.
टीम इंडियाने दुसऱ्या डावात शानदार पुनरागमन करत 462 धावा फलकावर लावल्या. यादरम्यान सरफराज खानने आंतरराष्ट्रीय स्तरावर पहिले शतक झळकावले आणि 150 धावांची खेळी केली. तर रिषभ पंतने 99 धावा केल्या. पंतचे शतक अवघ्या 1 धावाने हुकले. टीम इंडियाने दुसऱ्या डावात 462 धावा करून पराभव टाळण्यात यश मिळवले. पण भारताने न्यूझीलंडसमोर विजयासाठी 107 धावांचे लक्ष्य ठेवले. किवी संघाने 8 विकेट्स शिल्लक असताना ही धावसंख्या गाठली आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.
हेही वाचा-
IND VS NZ; सामना गमावताच कर्णधार रोहित शर्माच्या नावे लाजिरवाण्या विक्रमाची नोंद
झिम्बाब्वेचा भीमपराक्रम! भारताचा मोठा रेकॉर्ड अगदी थोडक्यात वाचला
न्यूझीलंडसमोर भारतानं गुडघे टेकले, बंगळुरू कसोटीत रोहित ब्रिगेडचा दारुण पराभव