भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर अपेक्षित कामगिरी करू शकलेला नाही. मागील चार सामन्यांमध्ये त्याच्या बॅटमधून केवळ 34 धावा निघाल्या असून, त्यामुळे त्याच्या फॉर्मवर आणि आगामी टी20 वर्ल्ड कप 2026 मधील भूमिकेवर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. मात्र, या सर्व चर्चांदरम्यानही टीम इंडिया मॅनेजमेंट आणि निवड समितीने सूर्याकुमार यादववर पूर्ण विश्वास कायम ठेवलेला आहे.
न्यूझीलंडविरुद्ध सुरू होणाऱ्या पाच सामन्यांच्या टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेआधी सूर्याकुमार यादवने पत्रकार परिषदेत आपल्या कामगिरीबाबत स्पष्ट भूमिका मांडली. सध्याच्या खराब फॉर्मबाबत बोलताना सूर्या म्हणाला की, नेट्समध्ये त्याची फलंदाजी चांगली झाली आहे आणि लवकरच त्याचे प्रतिबिंब सामन्यांतही पाहायला मिळेल. मुंबईचा हा आक्रमक फलंदाज आपल्या खेळाच्या शैलीत कोणताही बदल करण्याच्या मनस्थितीत नसल्याचं त्याने ठामपणे सांगितलं.
पहिल्या टी-20 सामन्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत सूर्यकुमार यादवने आपल्या फलंदाजी क्रमाबाबतही स्पष्टता दिली. संघाच्या गरजेनुसार तो नंबर तीन किंवा नंबर चार, दोन्ही स्थानांवर फलंदाजीसाठी तयार असल्याचं त्याने सांगितलं. भारतासाठी या दोन्ही क्रमांकांवर खेळण्याचा आपल्याला अनुभव असल्याचं सूर्याकुमारने नमूद केलं. आकडेवारी पाहता, नंबर चारवर त्याची कामगिरी किंचित अधिक प्रभावी राहिली असली, तरी नंबर तीनवरही त्याने उपयुक्त खेळी केल्या आहेत.
सध्या धावा न येत असल्या, तरी आपल्या नैसर्गिक आक्रमक शैलीत बदल करणार नसल्याचं सूर्यकुमार यादवने स्पष्ट केलं. मागील तीन-चार वर्षांत ज्या पद्धतीने यश मिळालं, त्याच पद्धतीने खेळत राहणार असल्याचा विश्वास त्याने व्यक्त केला. “जर अपेक्षित कामगिरी झाली नाही, तर मी अधिक मेहनत करेन, जास्त सराव करेन आणि अधिक मजबूत होऊन मैदानात परत येईन,” असंही सूर्याकुमार म्हणाला.






