भारताने मागील टी२० विश्वचषक जिंकला आहे, त्यातच सध्या संघ सात्यत्याने टी२० मालिका जिंकत आहे. तसेच आगामी टी२० विश्वचषक भारत आणि श्रीलंकेत होणार असल्याने भारताला विजयाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. अशातच भारतासाठी आनंदाची बातमी पुढे येत आहे. भारताचा स्टार फलंदाज जो दुखापतीमुळे काही काळ मैदानाबाहेर होता. तो आता दुखापतीतून सावरत असून लवकरच संघाशी जोडला जाणार आहे.
भारताचा स्फोटक फलंदाज तिलक वर्मा लवकरच संघात परतणार असल्याचे वृत्त समोर येत आहे. त्याच्या परतण्याने भारताच्या क्रमांक तीन फलंदाजीची अडचण दूर होईल. त्याला दुखापतीमुळे न्यूझीलंड विरुद्धच्या टी२० मालिकेतील काही सामन्यांना मुकावे लागले आहे. यासाठी त्याच्याजागी संघात श्रेयस अय्यरला संधी दिली आहे.
आता तिलकने सराव सुरू केला आहे. यामुळे तो न्यूझीलंड विरुद्धच्या चौथ्या सामन्यात संघात परतू शकतो.
काही रिपोर्ट्सनुसार, तिलक सध्या दुखापतीतून सावरत आहे. त्याला कोणत्याही प्रकारचे दुखणे नाही. यामुळे तो बीसीसीआयच्या बेंगलोरमधील सेंटर ऑफ एक्सिलेंसला (सीओई) जाणार आहे. येथे त्याची फिटनेस चाचणी होणार आहे. यावरून लवकरच त्याला संघाकडून खेळण्यासाठी हिरवा कंदिल मिळणार आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० मालिकेनंतर तिलकने विजय हजारे ट्रॉफीमध्ये हैद्राबादचे नेतृत्व केले होते. यामध्ये त्याने ३ जानेवारीला चंडीगड विरुद्ध शतकी खेळी केली होती. नंतर तो ६ जानेवारीला बंगालविरुद्ध खेळला. या सामन्यानंतरच त्याला दुखापत झाली.
तिलकच्या अनुपस्थितीत अय्यरला न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या तीन टी२० सामन्यांसाठी संघात जागी मिळाली आहे. तसेच वॉशिंग्टन सुंदरही दुखापतग्रस्त असल्याने त्याच्याजागी रवि बिश्नोईची वर्णी लागली आहे. त्याचबरोबर इशान किशनलाही संघात घेतल्याने त्याला कदाचित तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवले जाऊ शकते.
अय्यरने भारताकडून शेवटचा टी२० सामना २०२३मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळला होता. तसेच त्याने मागील वर्षी झालेल्या आयपीएलच्या अंतिम सामन्यानंतर एकही टी२० सामना खेळला नाही. त्याला न्यूझीलंड विरुद्ध संधी मिळाली तर तो कशी कामगिरी याकडे लक्ष आहे.
तिलकने आशिया कप स्पर्धेत भारताच्या विजयात महत्वाची भुमिका निभावली आहे. तसेच त्याने २०२५पासून भारतासाठी १८ टी२० डावांमध्ये ४७.२५च्या सरासरीने ५६७ धावा केल्या आहेत.
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात पहिला टी२० सामना २१ जानेवारीला नागपूर येथे खेळला जाणार आहे.
न्यूझीलंड विरुद्धच्या ५ सामन्यांच्या टी२० मालिकेसाठी भारताचा संघ-
सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, अभिषेक शर्मा, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, इशान किशन (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), जसप्रीत बुमराह, हर्षित राणा, कुलदीप यादव, वरूण चक्रवर्ती, रवि बिश्नोई






