भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने आक्रमक क्रिकेटची भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट करत रविवारी झालेल्या तिसऱ्या टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात न्यूझीलंडचा आठ विकेट्सनी पराभव केला. या विजयासह भारताने मालिकेत 3-0 अशी अजेय आघाडी घेतली. 154 धावांच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजांनी केवळ 10 षटकांत दोन विकेट गमावत 155 धावा करत सामना एकतर्फी केला.
या सामन्यात सलामीवीर अभिषेक शर्माने अवघ्या 14 चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावत न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर दडपण आणले. त्याने 20 चेंडूंमध्ये सात चौकार आणि पाच षटकारांसह नाबाद 68 धावांची तडाखेबाज खेळी केली. कर्णधार सूर्यकुमार यादवनेही आपली शानदार फॉर्म कायम राखत 26 चेंडूंमध्ये सहा चौकार आणि तीन षटकारांसह नाबाद 57 धावा केल्या.
सामन्यानंतर सूर्यकुमार यादव म्हणाला, “आम्हाला अशाच प्रकारचे आक्रमक क्रिकेट खेळायचे आहे. 20 धावांत तीन विकेट गेल्यानंतर कसे सावरायचे, हे आम्हाला माहीत आहे. वरच्या फळीतील दोन-तीन फलंदाजांनी माझे काम खूप सोपे केले.”
याआधी भारतीय गोलंदाजांनी दमदार कामगिरी करत न्यूझीलंडला 20 षटकांत 9 विकेट्सवर 153 धावांवर रोखले. जसप्रीत बुमराहने चार षटकांत केवळ 17 धावा देत तीन विकेट्स घेतल्या आणि ‘मॅन ऑफ द मॅच’चा मान पटकावला. त्याला हार्दिक पंड्या (दोन विकेट्स) आणि फिरकीपटू रवी बिश्नोई (दोन विकेट्स) यांची उत्तम साथ लाभली.
बिश्नोईच्या गोलंदाजीचे कौतुक करत सूर्यकुमार म्हणाला, “त्याची योजना अगदी स्पष्ट आहे. त्याला स्वतःच्या ताकदीची जाणीव आहे आणि योग्य वेळी योग्य चेंडू टाकायचा, हे त्याला माहीत आहे. वरुण चक्रवर्तीला आज चांगली विश्रांती मिळाली.”
न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनर पराभव स्वीकारत सांगितले, “आमच्यासाठी हा सामना कठीण ठरला. आमच्या धावा कमी पडल्या. हे 180-190 धावांचे विकेट होते, पण भारतीय गोलंदाजांनी पावरप्लेमध्ये आम्हाला दबावात टाकले. आम्ही आता विश्वचषकाच्या तयारीवर लक्ष केंद्रित करत आहोत.”






