भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-२० मालिकेचा पहिला सामना दिल्लीमध्ये खेळला गेला. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारताला ७ विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. आता उभय संघातील दुसरा सामना ओडिशाच्या कटक शहरामधील बाराबती स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे. दोन्ही संघ याठिकाणी पोहोचले आहेत आणि चाहत्यांनी त्यांचे जंगी स्वागत देखील केले आहे.
टी-२० मालिकेतील हा दुसरा सामना १२ जून रोजी खेळला जाणार आहे. कोरोना महामारीमुळे मागच्या मोठ्या काळापासून कटकमध्ये आंतरराष्ट्रीय सामना खेळला गेला नाहीये. अशात चाहत्यांमध्ये या सामन्यासाठी उत्साह स्पष्टपणे दिसत आहे. या सामन्यासाठी भारत आणि दक्षिण आफ्रिका दोन्ही संघ शुक्रवारी (१० जून) ओडिशात दाखल झाले. दोन्ही संघ दुपारी दोनच्या दरम्यान भुवनेश्वरच्या बीजू पटनायक आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले. याठिकाणी त्यांचे स्वागत करण्यासाठी शेकडो क्रिकेटप्रेमी उपस्थित होते.
दोन्ही संघातील खेळाडू विमानतळावर एकमेकांशी चर्चा आणि चेष्टा मस्करी करताना दिसले. चाहते विमानतळावर आणि खेळाडूंच्या हॉटेल्सटच्या बाहेर मोठ्या संख्येने उपस्थित होते. एवढेच नाही, या दोन्ही ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा आवडत्या खेळाडूंची फक्त एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केल्याचे दिसले. खेळाडूंना याप्रसंगी कडक सुरक्षेसह बसमधून हॉटेलमध्ये पोहोचवले गेले. बीसीसीआयने दोन्ही संघांचा ओडिशामध्ये पोहोचतानाचा एका खास व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
https://twitter.com/BCCI/status/1535248257009405952?s=20&t=ZTSp6qQa5ryagNwV9RSaWw
रविवारी खेळल्या जाणाऱ्या या सामन्याच्या आधी ओडिशा पोलीस महासंचालक एसके बंसल यांनी वरिष्ठ अधिकारी आणि जिल्हा प्रशासनासोबत बाराबती स्टेडियममधील नियोजनाविषयी चर्चा केली. पत्रकारांसोबत बोलताना बंसल यांनी माहिती दिली की, ते खेळाडूंना कडक सुरक्षा देणार आहेत. रविवारचा सामना सुरळीत पार पडावा यासाठी आणि शनिवारी सराव सत्रासाठी सर्व नियोजन केले गेले आहे.
दरम्यान, उभय संघातील ही टी-२० मालिका ५ सामन्यांची असून पहिल्या सामन्यानंतर दक्षिण आफ्रिकी संघाने १-० अशी आघाडी घेतली आहे. अशात आता दुसऱ्या सामन्यात भारताने विजय मिळवला, तर दोन्ही संघ बरोबरीवर येतील.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
शतक ठोकत रोहित- विराटचा विक्रम मोडायला निघालेला बाबर आझम, अर्धशतकावरच मानावं लागलं समाधान
‘त्याच्याकडे खूप प्रतिभा, पण फक्त आयपीएल लक्ष्य नको, पुढे विश्वचषक आहे’, गंभीरचा ‘या’ खेळाडूला सल्ला
झहीर खानने रिषभ पंतला सुनावले, म्हणाला ‘या’ गोलंदाजाचा योग्य वापर केला नाही