भारताचा युवा वेगवान गोलंदाज आवेश खान सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत भारताचे प्रतिनिधित्व करत आहे. उभय संघातील पहिला सामना गुरुवारी (९ जून) दिल्लीमध्ये खेळला गेला. भारताने यामध्ये मोठी धावसंख्या उभी केली होती, पण तरीदेखील संघाला पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात आवेश खानचे प्रदर्शन पाहिल्यानंतर माजी दिग्गज गौतम गंभीरने मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
आवेश खान (Avesh Khan) या सामन्यात एकही विकेट घेऊ शकला नाही, पण त्याने अतिरिक्त धावा देखील खर्च केल्या नाही. त्याने या सामन्यात टाकलेल्या ४ षटकांमध्ये ८.७५च्या इकॉनॉमीने ३५ धावा खर्च केल्या. तो इतर सर्व गोलंदाजांपेक्षा संघासाठी किफायशीर ठरला. या प्रदर्शनानंतर माजी दिग्गज फलंदाज गौतम गंभीर (Gautam Gambhir) याने आवेशचे चांगलेच कौतुक केले आहे. आवेश आयपीएल २०२२मध्ये लखनऊ सुपर जायंट्सचा खेळाडू होता आणि गंभीर देखील याच संघाचा मेंटॉर असल्यामुळे त्याला या गोलंदाजाविषयी चांगली माहिती आहे.
माध्यमांशी बोलताना गंभीर म्हणाला की, “या गोलंदाजाकडे खूप प्रतिभा आहे. त्याच्याकडे गती आहे. अवघड षटकांमध्ये गोलंदाजी करण्यासाठी एक मोठे मन आहे, पण मी त्याला प्रत्येक सामन्यात अधिक उत्तम बनताना पाहू इच्छितो. तो एक युवा गोलंदाज आहे, पण त्याले लक्ष्य केवळ आयपीएल नकोय, टी-२० विश्वचषक पुढे येत आहे. त्याच्याकडे ती वृत्ती आहे, जी एका वेगवान गोलंदाजाकडे हवी असते. सर्वात महत्वाचे हे आहे की, तो अजूनही युवा आहे आणि अजून शिकू इच्छित आहे. जर तो मेहनत करत राहिला, तर टी-२० मध्येच नाही, तर तिन्ही प्रकारांमध्ये एक चांगला गोलंदाज बनू शकतो”