गुरुवारी (९ जून) भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-२० मालिकेची सुरुवात झाली. मालिकेतील पहिला सामना दक्षिण आफ्रिका संघाने नावावर केला. आयपीएलमधील दमदार प्रदर्शनानंतर अष्टपैलू हार्दिक पंड्या आणि यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक यांनी भारतीय संघात पुनरागमन केले आहे. परंतु पहिल्याच सामन्यात या दोघांमध्ये ताळमेळ नसल्याचे दिसले. शेवटच्या षटकात हार्दिकने कार्तिकला स्ट्राईक न दिल्यामुळे अनेकजण नाराजी व्यक्त करत आहेत. आता या यादीत आशिष नेहरा देखील जोडला गेला आहे.
आयपीएल २०२२ हंगामात गुजरात टायटन्स संघ विजेता ठरला. हार्दिक पंड्या (Hardik Pandya) या संघाचा कर्णधार होता, तर आशिष नेहरा (Ashish Nehra) गुजरातचा प्रशिक्षक होता. हंगामात या जोडीने एकत्र काम केले आणि विजेतेपद पटकावले. अशात आता आयपीएल हंगाम संपल्यानंतर देखील नेहराने हार्दिकला एक सल्ला दिला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात हार्दिक शेवटच्या षटकात अनुभवी दिनेश कार्तिक (Dinesh karthik) याला स्ट्राईक देऊ शकत होता, पण त्याने तसे केले नाही. याच पार्श्वभूमीवर नेहरा व्यक्त झाला आहे.
माध्यमांशी बोलताना नेहरा म्हणाला की, “शेवटच्या चेंडूआधी त्याने एक धाव घेतली पाहिजे होती. दुसऱ्या बाजूला दिनेश कार्तिक होता, मी नाही.” नेहराची ही मजेशीर प्रतिक्रिया चाहत्यांना चांगलीच भावली आहे. नेहराला देखील चांगल्या प्रकारे ठाऊक आहे की, कार्तिक शेवटच्या षटकांमध्ये काय कमाल करू शकतो. कार्तिकने आयपीएल २०२२ मधील अनेक सामन्यांमध्ये शेवटच्या चेंडूवर चौकार आणि षटकार मारले आहेत.
हार्दिकविषयी बोलताना नेहरा म्हणाला की, “हार्दिक पंड्या असा व्यक्ती आहे, जो प्रत्येक भूमिका पार पाडू शकतो. त्याने प्रत्येक पद्धतीची फलंदाजी केली आहे. आपण त्याला कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये चांगले प्रदर्शन करताना पाहिले आहे. त्याच्या फलंदाजीची क्षमता पाहता, तो शक्यतो कणत्याही क्रमांकावर खेळू शकतो. मत तो तिसरा क्रमांक असो किंवा चौथा असो.”
“तो गुजरातचा कर्णधार होता आणि त्याने गोलंदाजीमध्ये चांगले योगदान दिले. ही एक वेगळी भूमिका होती. याच्या आधी तो जास्त गोलंदाजी करत नव्हता आणि खालच्या फळीत फलंदाजी करत होता. आता तो त्याच्या जुन्या भूमिकेत परतला आहे. तो कोणताही भूमिका सहजरीत्या करण्याची ताकद ठेवतो.”
दरम्यान, उभय संघातील या सामन्याचा विचार केला, तर दक्षिण आफ्रिका संघाने १९.१ षटकात आणि ३ विकेट्स गमावून विजय मिळवला. हार्दिक पंड्याने १२ चेंडूत २ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने महत्वाच्या ३१ धावा चोपल्या. तर कार्तिक २ चेंडूत १ धाव करू शकला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
चर्चाच एवढी रंगलीय की, उमरान ‘रॉकेट’ मलिकच्या स्पीडनं लोकं वेडी व्हायची राहिलीत
चर्चाच एवढी रंगलीय की, उमरान ‘रॉकेट’ मलिकच्या स्पीडनं लोकं वेडी व्हायची राहिलीत
जेव्हा दीपिकाने मल्या पुत्राला लाईव्ह मॅचमध्ये केली होती किस, चांगलीच रंगलेली चर्चा