भारतीय संघाला ६ फेब्रुवारीपासून वेस्ट इंडीजविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्याची मायदेशातील मालिका (ind vs wi odi series) खेळायची आहे. एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना भारतीय संघाच्या इतिहासातील १००० वा एकदिवसीय सामना असेल. विशेष म्हणजे भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याने त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत एकूण ४६३ एकदिवसीय सामने खेळले. एकदिवसीय मालिकेची सुरूवात होण्यापूर्वी सचिनने एक खास मुलाखत दिली आहे. त्याच्या मते १९९६ विश्वचषकानंतर भारतात एकदिवसीय क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थाने क्रांती घडली होती.
वेस्ट इंडीजविरुद्ध एकदिवसीय मालिका सुरू होण्यापूर्वी सचिन म्हणाला की, “एकदिवसीय क्रिकेटने १९९६ विश्वचषकात उंची गाठली होती आणि त्याच वेळी सर्वात मोठा बदल घडला. त्यापूर्वी १९८३ विश्वचषक झाला होता आणि तो खूप अद्भुत होता. होय, त्यावेळी स्टेडियम पूर्णपणे भरलेले होते, पण १९९६ विश्वचषकानंतर गोष्टी बदलू लागल्या आणि तो बदल दिसू लागला. मी त्याल बदलांचा अनुभव घेतला आणि एकदिवसीय क्रिकेटला एक नवीन उंची मिळाली.”
दरम्यान, सचिन तेंडुलकर भारतीय संघाच्या इतिहासातील सर्वात यशस्वी फलंदाज राहिला आहे. त्याने कारकिर्दीत १०० शतके करण्याचा विक्रम केला आहे. एकदिवसीय क्रिकेटमधील त्याचे प्रदर्शन उत्कृष्ट होते. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने १८००० पेक्षा जास्त धावा केल्या आणि ४९ वेळा शतकी खेळीही केली. भारतीय संघाच्या २००, ३००, ४००, ५००, ६००, ७०० आणि ८०० व्या एकदिवसीय सामन्यांमध्ये सचिनने संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.
भारताच्या वेस्ट इंडीज विरुद्ध ६ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या मालिकांचा विचार केला, तर उभय संघांमध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय आणि तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळली जाणार आहे. एकदिवसीय मालिका अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर ६, ९ आणि ११ फेब्रुवारीला खेळली जाणार आहे. तर टी-२० मालिका कोलकातामधील ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळली जाईल. टी-२० मालिकेतील सामने १६, १८ आणि २० फेब्रुवारीला खेळले जातील.
महत्वाच्या बातम्या –
व्हीलचेअरवर आलेल्या ख्रिस केर्न्सच्या आयुष्यात आणखी एक वादळ; कॅन्सरचे झाले निदान
विश्वचषकात मालिकावीर ठरला की तो खेळाडू १०० टक्के टीम इंडियात येतोच, मग यंदा कोण मिळवेल तो मान?