आशिया चषक 2022 मधील भारतीय संघाने आपला अखेरचा सामना अफगाणिस्तानविरुद्ध खेळला. सुपर फोरमधील पहिल्या दोन सामन्यात पराभूत झाल्याने भारताचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले होते. यात औपचारिक सामन्यात भारतीय संघाने आपली कामगिरी उंचावत 101 धावांनी विजय मिळवत, स्पर्धेचा विजयी शेवट केला. विराट कोहलीचे पहिले टी20 शतक व भुवनेश्वर कुमारचे पाच बळी भारतीय संघाच्या विजयाचे वैशिष्ट्य ठरले.
ASIA CUP 2022. India Won by 101 Run(s) https://t.co/1UkuWxxvOG #INDvAFG #AsiaCup2022
— BCCI (@BCCI) September 8, 2022
भारत व अफगाणिस्तान संघाने सुपर फोरमधील आपले पहिले दोन्ही सामने गमावल्याने दोन्ही संघांसाठी हा सामना औपचारिक होता. भारतीय संघ या सामन्यात नियमित कर्णधार रोहित शर्माविना उतरला. भारताला या सामन्यात प्रथम फलंदाजीची संधी मिळाली. रोहितच्या अनुपस्थितीत कर्णधार राहुल विराटसह सलामीला आला. दोघांनी मागील अपयश भरून काढत संघाला प्रथमच शतकी सलामी दिली. दोघांनीही लागोपाठ अर्धशतके साजरी करत, संघाला मोठ्या धावसंख्येच्या दिशेने नेले. राहुल अर्धशतक करून बाद झाल्यानंतर आलेला सूर्यकुमार यादव फार काळ टिकला नाही. मात्र, दुसऱ्या बाजूने विराटने आपला झंझावात कायम राखत आपले पहिले टी20 शतक पूर्ण केले. हे त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील 71वे शतक ठरले. 122 धावांवर अखेरपर्यंत नाबाद राहत, त्याने भारतीय संघाला 212 पर्यंत पोहोचवले.
भल्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या अफगाणिस्तान संघाला हे आव्हान कधीच पेलवले नाही. अनुभवी भुवनेश्वर कुमार याने 3 षटकात 4 गडी तंबूत पाठवत अफगाणिस्तानच्या आव्हानातील हवा काढून टाकली. इब्राहिम झादरानने सर्वाधिक नाबाद 64 धावा केल्या. अफगाणिस्तान संघ पूर्ण 20 षटके खेळला. तरीही त्यांना 101 धावांनी पराभूत व्हावे लागले. भारतासाठी भुवनेश्वर कुमारने 5 बळी टिपले. शतकी खेळी करणाऱ्या विराट कोहलीला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.