या संघांनी जिंकले आहे आजपर्यंत १९ वर्षांखालील विश्वचषक
आज १२ व्या १९ वर्षांखालील विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियावर विजय मिळवून चौथ्यांदा या विश्वचषकावर नाव कोरले आहे. या विजयाबरोबरच भारतीय संघाने सर्वाधिक वेळा १९ वर्षांखालील विश्वचषक जिंकण्याचाही मोठा विक्रमही केला आहे.
या १९ वर्षांखालील विश्वचषकाआधी भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांनी प्रत्येकी ३ वेळा विश्वचषक जिंकला होता. त्यामुळे या दोन्ही संघांना त्यांचा चौथा विश्वचषक जिंकून सर्वाधिक वेळा विश्वचषक जिंकणारा संघ बनण्याची संधी होती. या संधीने पृथ्वी शॉच्या टीम इंडियाने सोने केले.
या विश्वचषकात भारतीय संघाची सांघिक कामगिरी उत्तम झाली. या संपूर्ण स्पर्धेत भारत अपराजित राहिला आहे. या विश्वचषकात शुभमन गिल, पृथ्वी शॉ, अनुकूल रॉय, कमलेश नागरकोटी, ईशान पोरेल असे खेळाडू चांगलेच चमकले.
भारताने याआधी मोहम्मद कैफ(२०००),विराट कोहली(२००८) आणि उन्मुक्त चंद(२०१२) यांच्या नेतृत्वाखाली हा विश्वचषक जिंकले होते. यावर्षी पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली हा विश्वचषक जिंकून भारतीय संघाने इतिहास रचला आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया पाठोपाठ पाकिस्तानने २ वेळा हा विश्वचषक जिंकला आहे . यावर्षी भारतीय संघाने उपांत्य सामन्यात पाकिस्तानचा २०३ धावांनी पराभव केला होता.
इंग्लंड,दक्षिण आफ्रिका, विंडीज या संघांनी आत्तापर्यंत प्रत्येकी एकदा हा विश्वचषक जिंकला आहे.
या संघांनी जिंकला आहे १९ वर्षांखालील विश्वचषक:
१९८८: ऑस्ट्रेलिया
१९९८: इंग्लंड
२०००: भारत
२००२:ऑस्ट्रेलिया
२००४:पाकिस्तान
२००६:पाकिस्तान
२००८: भारत
२०१०:ऑस्ट्रेलिया
२०१२:भारत
२०१४: दक्षिण आफ्रिका
२०१६:विंडीज
२०१८:भारत