इंग्लंड आणि भारत यांच्यातील तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना मॅंचेस्टर येथे खेळला गेला. भारतीय संघाने पाच गड्यांनी हा सामना जिंकत मालिका २-१ अशा फरकाने आपल्या नावे केली. अष्टपैलू हार्दिक पंड्या व यष्टिरक्षक रिषभ पंत भारताच्या विजयाचे शिल्पकार ठरले. या विजयानंतर भारतीय संघाने मागील सात वर्षांपासून इंग्लंडविरुद्ध असलेली आपली हुकूमत कायम ठेवली आहे.
भारतीय संघाचा जबरदस्त खेळ
मँचेस्टर येथे खेळल्या गेलेल्या या तिसऱ्या सामन्यात दोन्ही संघांना विजय अनिवार्य होता. या निर्णायक सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. हार्दिक पंड्याने चार व युझवेंद्र चहलने तीन बळी मिळवत इंग्लंडला २५९ धावांवर रोखले. इंग्लंडसाठी कर्णधार जोस बटलरने एकमेव अर्धशतक ठोकले.
प्रत्युत्तरात भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. आघाडीचे तीनही फलंदाज केवळ ३८ धावांवर बाद झाले. सूर्यकुमार यादवही चौथ्या गड्यांच्या रुपात तंबूत परतला. त्यानंतर हार्दिक पंड्या व यष्टिरक्षक रिषभ पंत यांनी शतकी भागीदारी केली. हार्दिकने अर्धशतक ठोकले. रिषभने नाबाद शतक ठोकत भारतीय संघाला या सामन्यात विजय मिळवून दिला. तोच सामन्याचा मानकरी ठरला.
भारतीय संघाची हुकूमत कायम
या मालिका विजयासह भारतीय संघाने इंग्लंड विरुद्धचा वनडेतील विजयरथ कायम राखला. भारतीय संघाने २०१५ विश्वचषकानंतर इंग्लंडविरुद्ध चार वनडे मालिका खेळल्या आहेत. त्यापैकी तीन भारतीय संघाने आपल्या नावे केल्या. २०१७ मध्ये भारताने २-१, २०१८ मध्ये इंग्लंडने २-१ आणि त्यानंतर २०२१ मध्ये पुन्हा भारतीय संघाने २-१ असा विजय मिळवला होता. विशेष म्हणजे भारतीय संघाने २०१४ नंतर पहिल्यांदाच इंग्लंडमध्ये वनडे मालिका जिंकण्याची कामगिरी केली. त्यावेळी भारतीय संघाने एमएस धोनीच्या नेतृत्वात हा विजय मिळवला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
बाबरच्या शतकामुळे पाकिस्तानची समाधानकारक कामगिरी, नावावार केला खास विक्रम
तू चुकतोय; कर्णधार रोहित शर्माच्या ‘या’ निर्णयावर माजी भारतीय क्रिकेटरने मुरडले नाक