गुरुवारपासून(17 डिसेंबर) ऍडलेड येथे ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. चार सामन्यांची ही कसोटी मालिका असून पुढील सामने मेलबर्न, सिडनी आणि ब्रिस्बेन येथे होतील. 19 जानेवारी 2021 पर्यंत ही मालिका संपेल.
विशेष म्हणजे या कसोटी मालिकेतील ऍडलेड येथे होत असलेला सामना दिवस-रात्र खेळवला जात आहे. हा भारताचा परदेशातील पहिलाच दिवस-रात्र कसोटी सामना आहे.
भारतीय संघाची ही ऑस्ट्रेलिया विरुद्ध ऑस्ट्रेलियन भूमीतील 13वी कसोटी मालिका असून आधी झालेल्या 12 मालिकांपैकी ऑस्ट्रेलियाने 8 मालिका जिंकल्या आहेत. तर भारताने 1 मालिका जिंकली आहे. यामधील 3 मालिका अनिर्णीत राहिल्या. या मालिकेमधील 48 सामन्यात भारताला फक्त 7 सामने जिंकता आले आहेत.
असा आहे भारताचा ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कसोटी मालिकांचा इतिहास-
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत (1948-49): 4-0
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यात 1948ला पहिली कसोटी मालिका खेळली गेली. या मालिकेत 5 सामने झाले होते. लाला अमरनाथ यांच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाला ही मालिका 4-0 अशी गमवावी लागली होती. या मालिकेतील 1 सामना अनिर्णीत राहिला होता. यावेळी ऍडलेड येथील कसोटी सामन्यात भारताकडून विजय हजारे यांनी 116 आणि 145 धावांची खेळी केली होती.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत (1967-68): 4-0
भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील दुसरी कसोटी मालिका तब्बल 20 वर्षानंतर खेळली गेली. 1967च्या या कसोटी मालिकेत भारतीय संघ नवाब पतौडी यांच्या नेतृत्वाखाली खेळत होता. 4 सामन्यांची ही मालिका भारताने 4-0 अशी गमावली होती.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत (1977-78): 3-2
भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील तिसरी कसोटी मालिका 1977-78 ला खेळवण्यात आली. या मालिकेत 5 सामने झाले होते. विशेष म्हणजे या मालिकेत भारतीय संघाने चांगले प्रदर्शन केले होते. बिशनसिंग बेदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ या मालिकेत खेळला होता. त्यावेळी 5 सामन्यांपैकी भारताने 2 सामने जिंकण्यात यश मिळवले होते. पण ऑस्ट्रेलियाने 3 सामने जिंकल्याने भारताला ही मालिका 3-2 अशा फरकाने गमवावी लागली होती. या मालिकेत बिशन सिंग यांनी कर्णधाराला साजेशी कामगिरी केली होती. त्यांनी या मालिकेत सर्वाधिक 31 विकेट्स घेतल्या होत्या. तसेच गुंडप्पा विश्वनाथ आणि सुनील गावसकर यांनी 50 पेक्षा अधिकच्या सरासरीने 400 पेक्षा अधिक धावा केल्या होत्या.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत (1980-81): 1-1
1980-81च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कसोटी मालिकेत भारतीय संघ सुनिल गावसकर यांच्या नेतृत्वाखाली खेळला. यामध्ये कपिल देव आणि गुंडप्पा विश्वनाथ यांनी चमकदार कामगिरी केल्याने पहिल्यांदाच भारताला ऑस्ट्रेलियामध्ये ऑस्ट्रेलियाला 1-1 असे रोखता आले. 3 सामन्यांच्या या मालिकेतील भारताने तिसरा कसोटी सामना जिंकून मालिका बरोबरीत राखण्यात यश मिळवले होते . या जिंकलेल्या सामन्यात कपिल देव यांनी 28 धावात 5 विकेट घेतल्या होत्या. हा सामना भारताने 59 धावंनी जिंकला होता.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत (1985-86): 0-0
1883चा वन-डे विश्वचषक जिंकलेल्या भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला 1985च्या कसोटी मालिकेतही 0-0 असे रोखले. 3 कसोटी सामन्यांच्या मालिकेत फलंदाजांचेच वर्चस्व राहिले. असे असले तरी या मालिकेतील ऍडलेड ओव्हल येथे झालेल्या कसोटी सामन्यात भारतीय कर्णधार कपिल देवने 106 धावांवर 8 विकेट्स घेतल्या होत्या. त्याने ऍलन बॉर्डरला 49 धावावर बाद केले होते. यावेळी 99 धावांवर 3 विकेट घेणाऱ्या देवने पुढील पाच विकेट्स फक्त सात धावा देत घेतल्या. या सामन्यात सुनिल गावसकरने पहिल्या डावात नाबाद 166 धावा केल्या होत्या. या मालिकेतील तिन्ही सामने अनिर्णीत राहिले होते.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत (1991-92): 4-0
1987चे विश्वविजेत्या ठरलेल्या ऑस्ट्रेलियाने ऍलन बॉर्डर यांच्या नेतृत्वाखाली खेळताना भारताला 1991-92 ला झालेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 4-0 असे पराभूत केले. भारतीय संघ मोहमद अझरूद्दीनच्या नेतृत्वाखाली खेळला होता. या मालिकेत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांनी सळो की पळो करून सोडले होते.
यातील चौथ्या कसोटी सामन्यात अझरूद्दीनने 106 धावांची शतकी खेळी केली होती. पण त्या सामन्यात भारताला 38 धावांनी पराभूत व्हावे लागले. तसेच पाचव्या सामन्यात सचिन तेंडुलकरने 114 धावांची शतकी खेळी केली होती परंतु, ऑस्ट्रेलियाकडून डेविड बून, डिन जोन्स आणि टॉम मुडी यांनीही शतके झळकावली होती. तसेच माईक व्हिटनीने 11 विकेट्स घेतल्या होत्या. त्यामुळे भारताने हा सामना 300 धावांनी गमावला. त्याआधी पहिले दोन सामनेही ऑस्ट्रेलियाने जिंकले होते. तर तिसरा सामना अनिर्णित राहिला होता.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत (1999-00): 3-0
सचिन तेेंडुलकरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाला 1999-00च्या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलिया विरुद्ध 3-0 असे पराभवाला सामोरे जावे लागले होते. यावेळी ग्लेन मॅकग्रा आणि ब्रेट ली या दोघांनी भारतीय फलंदाजांना पिचवर अधिक काळ टिकू दिले नाही. मॅकग्राने या मालिकेत 3 सामन्यात 18 विकेट्स घेतल्या होत्या आणि ब्रेट लीने 2 सामन्यात 13 विकेट्स घेतल्या होत्या. तसेच रिकी पाँटिंगले 2 शतके आणि 1 अर्धशतकासह 375 धावा केल्या होत्या.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत (2003-04): 1-1
ही मालिका ऑस्ट्रेलियाचे महान कर्णधार स्टिव्ह वॉ यांच्या कारकीर्दीतील शेवटची कसोटी मालिका होती. या मालिकेत भारतीय फलंदाजांनी अप्रतिम खेळ करत मालिका 1-1 अशी बरोबरीत सोडवण्यात यश मिळवले होते. या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय कर्णधार राहुल द्रविडने 233 धावा केल्या होत्या. तर तिसऱ्या कसोटीत विरेंद्र सेहवागने 195 धावा केल्या. या मालिकेत पहिल्या तीन सामन्यात अपयशी ठरलेल्या तेंडुलकरने चौथ्या सामन्यात 241 धावांची आणि व्हीव्हीएस लक्ष्मणने 178 धावांची खेळी केली होती.
सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने या मालिकेतील दुसरा कसोटी सामना भारताने जिंकला होता. तर पहिला सामना अनिर्णीत राहिला होता. तसेच तिसरा सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला होता आणि चौथा सामना अनिर्णीत राहिल्याने ही मालिका बरोबरीत सुटली होती.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत (2007-08): 2-1
भारतीय संघ कर्णधार अनिल कुंबळेच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियामध्ये चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत खेळला. भारताने पहिला सामना तब्बल 337 धावांनी गमावला होता. तर दुसरा सामना देखील ऑस्ट्रेलियाने जिंकत आघाडी घेतली होती. पण नंतर तिसऱ्या सामन्यात भारताने विजय मिळवला. तर चौथा सामना अनिर्णीत राहिला. या मालिकेत सचिनने सर्वाधिक 493 धावा केल्या. मात्र ही मालिका खेळाडूंच्या कामगिरीपेक्षा ‘मंकीगेट’ प्रकरणामुळेच जास्त गाजली.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत (2011-12): 4-0
28 वर्षानंतर दुसरा विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाची एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली 2011-12 च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेत ढिसाळ कामगिरी झाली. यातील पहिला सामना 122 धावांनी, दुसरा सामना एक डाव आणि 68 धावा, तिसरा सामना एक डाव आणि 37 धावा आणि चौथा सामना 298 धावांनी गमावत भारताला व्हाईटवॉश पत्करावा लागला होता. या मालिकेनंतर धोनीच्या कर्णधार पदावर देखील प्रश्नचिन्हही उपस्थित झाले होते.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत (2014-15): 2-0
2014-15 च्या भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यानच फिलिप ह्यूजेसचे दुर्दैवीरित्या निधन झाल्याने कसोटी मालिकेचे वेळापत्रक थोडे बदलण्यात आले होते. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताचा तत्कालीन नियमित कर्णधार एमएस धोनी दुखापतीमुळे खेळला नव्हता. या सामन्यात विराट कोहलीने नेतृत्व केले होते.
तसेच विशेष म्हणजे या मालिकेतील तिसऱ्या सामन्यानंतर धोनीने कसोटीतून निवृत्ती घेतल्याने भारताने चौथा सामना पुन्हा विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळला होता. या सामन्यापासून विराटने भारताचे कसोटीत नियमित कर्णधारपद सांभाळले. या मालिकेतील तिसरा आणि चौथा सामना अनिर्णीत राहिला होता. तर पहिले दोन सामने ऑस्ट्रेलियाने जिंकले होते. फलंदाजीत भारताकडून विराट चमकला होता. त्याने या मालिकेत चार शतके केली होती.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत (2018-19) – 1-2
भारतीय संघासाठी 2018-19 चा ऑस्ट्रेलिया दौरा खुप खास ठरला. या दौऱ्यात भारताला मोठे यश मिळाले. या दौऱ्यातील 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताने विराटच्या नेतृत्वाखाली 2-1 अशा फरकाने ऐतिहासिक विजय मिळवला होता. त्या मालिकेत चेतेश्वर पुजारा चांगलाच चमकला होता. त्याने सर्वाधिक 521 धावा केल्या होत्या. यात 3 शतके आणि 1 अर्धशतकाचा समावेश होता. तसेच भारतीय गोलंदाजांनीही शानदार कामगिरी केली होती. गोलंदाजीत भारताकडून जसप्रीत बुमराहने 21 आणि मोहम्मद शमीने 16 विकेट्स घेतल्या होत्या.
या मालिकेत भारताने ऍडलेड आणि मेलबर्न या मैदानांवर विजय मिळवला होता. तर सिडनीतील कसोटी सामना अनिर्णीत राहिला होता आणि पर्थ कसोटीत भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
‘उडता कोहली’! भारतीय कर्णधाराने डाइव्ह मारत घेतला भन्नाट झेल, व्हिडिओ जोरदार व्हायरल
आर अश्विनच्या फिरकीपुढे गोंधळला ऑस्ट्रेलियन अष्टपैलू, झेल दिला थेट हातात; पाहा Video
ऑस्ट्रेलियाच्या धडाकेबाज फलंदाजाचा साधारण झेल बुमराहकडून ‘मिस’, व्हिडिओ व्हायरल