आज (8 मार्च) मेलबर्न येथे महिला दिनाच्या मुहूर्तावर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला संघात (INDWVsAUSW) आयसीसी महिला टी20 विश्वचषकातील (ICC Women’s T20 World Cup) अंतिम सामना होणार आहे. टी20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात खेळण्याची भारतीय महिला संघाची ही पहिलीच वेळ आहे.
भारताचा हा या वर्षातील ऑस्ट्रेलिया संघाविरुद्धचा पाचवा टी20 सामना असणार आहे. यापुर्वी भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध यावर्षी विश्वचषकाआधी झालेल्या महिला टी20 तिरंगी मालिकेत (Womens T20 Tri-Series) 3 आणि टी20 विश्वचषकातील 1 असे एकूण 4 सामने खेळले आहेत.
यापैकी तिरंगी मालिकेतील एका सामन्यात आणि विश्वचषकातील पहिल्याच सामन्यात भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्ध विजय मिळवला आहे. तर, ऑस्ट्रेलियाने तिरंगी मालिकेतील 2 सामन्यात भारताविरुद्ध विजय मिळवला आहे. त्यामुळे यावर्षी दोन्ही संघाच्या विजयाचे पारडे 4 सामन्यांनंतर 2-2 विजयांसह समान आहे. त्यामुळे आता कोणता संघ आज वरचढ ठरणार हे पहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.






