बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतानं सहज विजय मिळवला. आता भारतीय संघ कानपूरला पोहोचला आहे, जिथे भारत आणि बांगलादेश यांच्यात दुसरा कसोटी सामना खेळला जाईल. या कसोटीतही भारतीय संघाचं पारडं जड आहे. मात्र कानपूरच्या संथ खेळपट्टीवर बांगलादेशचे शाकिब अल हसन, मेहदी हसन मिराज आणि तैजुल इस्लाम सारखे फिरकी गोलंदाज भारतीय फलंदाजांसाठी अडचणी निर्माण करू शकतात. अशा परिस्थितीत कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक गौतम गंभीर यांना त्यांच्या रणनीतीत काही बदल करावे लागतील.
रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा हे भारतीय संघाचे दोन प्रमुख फिरकीपटू आहेत. या सामन्यासाठी त्यांची जागा निश्चित आहे. मात्र तिसरा फिरकी गोलंदाज म्हणून अक्षर पटेल ऐवजी कुलदीप यादवला प्राधान्य दिलं जाऊ शकतं. कुलदीपची चायनामन गोलंदाजी आणि बांगलादेशविरुद्धची त्याची उत्कृष्ट कामगिरी लक्षात घेता त्याचा संघात समावेश केला जाऊ शकतो.
वेगवान गोलंदाजीत मोहम्मद सिराजला या सामन्यात विश्रांती दिली जाऊ शकते. सिराजनं अलीकडेच आपल्या लाईन आणि लेन्थ मध्ये सुधारणा केली आहे. परंतु चेन्नई कसोटीत आकाश दीपनं चांगली कामगिरी केली. आकाशचा वेग आणि अचूकतेनं निवडकर्त्यांना प्रभावित केलं असून त्याला या सामन्यात देखील खेळण्याची संधी मिळू शकते.
भारतीय संघाच्या फलंदाजी क्रमात बदल होण्याची शक्यता फार कमी आहे. शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल आणि यष्टिरक्षक रिषभ पंत यांनी पहिल्या कसोटीत चांगली कामगिरी केली. तर कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुलसारखे अनुभवी फलंदाज अपेक्षेप्रमाणे खेळू शकले नाहीत. असं असूनही त्यांचं संघातील स्थान निश्चित मानलं जातंय.
बांगलादेशविरुद्ध भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन – रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, रिषभ पंत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, आकाश दीप, जसप्रीत बुमराह
हेही वाचा –
इराणी चषकासाठी संजू सॅमसनकडे पु्न्हा दुर्लक्ष; या कारणांमुळे संघात स्थान नाही?
“आम्हाला आमच्या संघात विराट कोहलीला घ्यायला आवडेल”, या कर्णधारानं व्यक्त केली इच्छा
कोहली की रूट? सचिन तेंडुलकरचा विक्रम कोण मोडू शकतो; माजी क्रिकेटपटू स्पष्टचं म्हणाला….