बांगलादेशविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी20 आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी संजू सॅमसनची भारतीय संघात यष्टीरक्षक फलंदाज म्हणून निवड करण्यात आली आहे. जितेश शर्मा देखील टी20 संघाचा भाग असेल, परंतु तो बॅकअप यष्टिरक्षकाच्या भूमिकेत असेल. त्यामुळे संजू सॅमसन तिन्ही टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळणार आहे आणि हे सामने त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीतील सर्वात महत्त्वाचे सामने ठरणार आहेत. जर सॅमसनने येथे चूक केली, तर भविष्यात त्याला दुसऱ्या संधीसाठी बराच काळ प्रतीक्षा करावी लागू शकते.
खरे तर, संजू सॅमसनने 30 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, ज्यामध्ये तो 26 डावांमध्ये फलंदाजीसाठी उतरला आहे आणि केवळ 3 वेळा नाबाद परतला आहे. त्याने एकूण 444 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या 77 धावा राहिली आहे. त्याची फलंदाजी सरासरी 19.3 आहे, तर त्याचा स्ट्राइक रेट 131.36 आहे. मात्र त्याने एकही शतक झळकावलेले नाही. पण त्याने 2 अर्धशतके केली आहेत. ही आकडेवारी पाहता संजू सॅमसनची कारकीर्द धोक्यात असल्याचे स्पष्टपणे म्हणता येईल, कारण अनेक संधी मिळूनही तो टी20 संघात आपले स्थान पक्के करू शकलेला नाही. यामुळे, त्याला वनडे संघातूनही वगळण्यात आले आहे.
वनडे क्रिकेटमध्ये, संजू सॅमसन 16 सामन्यांच्या 14 डावांपैकी 5 वेळा नाबाद राहिला आहे आणि त्याने 510 धावा केल्या आहेत. यामध्ये एका शतकाचाही समावेश आहे. 108 धावा ही त्याची वनडेतील सर्वोच्च धावसंख्या राहिली आहे. वनडेत त्याची फलंदाजी सरासरी 56.67 आहे आणि स्ट्राइक रेट 99.61 आहे. एका शतकाशिवाय त्याने 3 अर्धशतकेही केली आहेत. अशा प्रकारे, वनडे क्रिकेटमध्ये त्याची आकडेवारी चांगली दिसते. परंतु टी20 क्रिकेटमध्ये तो आक्रमक खेळण्यात सातत्याने अपयशी ठरताना दिसत आहे. 2024 च्या टी20 विश्वचषक संघातही त्याची निवड झाली होती, पण त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही. त्याला सराव सामन्यात संधी देण्यात आली होती, पण त्याला खातेही उघडता आले नव्हते.
टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये संजू सॅमसनला 30 सामन्यांमध्ये 4 वेळा खाते उघडता आलेले नाही, तर 7 सामन्यांमध्ये तो दुहेरी आकडा पार करण्यापूर्वीच बाद झाला आहे. त्यामुळे 2015 मध्ये टी20 क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या संजू सॅमसनसाठी बांगलादेशविरुद्धचे तीन सामने आपली कारकीर्द वाचवण्याची संधी आहे. जर तो अपयशी ठरला तर रांगेत अनेक यष्टीरक्षक आहेत, ज्यात रिषभ पंत, जितेश शर्मा, केएल राहुल आणि इशान किशन यांच्या नावांचा समावेश आहे. केएल राहुल सध्या टी20 सेटअपपासून दूर असल्याचे दिसते, तर पंतची कसोटी क्रिकेटमुळे विश्रांती देण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
भारताविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी बांगलादेशचा संघ जाहीर, 14 महिन्यांनंतर मॅच विनर खेळाडूचे पुनरागमन
इशान किशनचे भारतीय संघातील पुनरागमन लांबणीवर, ‘या’ कारणामुळे मिळाले संकेत!
INDvsBAN : अभिषेक शर्मा अन् ‘या’ खेळाडूची सलामी जोडी ठरू शकते धोकादायक; माजी निवडकर्त्यांचे मत