भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा टी२० सामना शुक्रवारी (१७ जून) राजकोट येथे खेळला जाणार आहे. या सामन्यातही यजमान संघाची स्थिती ‘करो वा मरो’ अशीच असणार आहे. पाच सामन्यांच्या या टी२० मालिकेत दक्षिण आफ्रिकेचा संघ सलग दोन सामने जिंकत २-१ने पुढे आहे. विशाखापट्टणम येथे झालेला तिसरा सामना भारताने ४८ धावांनी जिंकत मालिकेतील आव्हान कायम ठेवले आहे. चौथ्या सामन्यात दोन्ही संघ सामना जिंकण्याच्याच हेतूने मैदानात उतरणार आहेत.
हा सामना सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर सायंकाळी ७ वाजता खेळला जाणार आहे. दोन्ही संघाच्या सामना जिंकण्याच्या आशेवर हवामान पाणी फेरणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. राजकोट येथे नुकताच पाऊस पडून गेला आहे. तर शुक्रवारी वातावरण ढगाळ राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
भारतीय संघ चौथा सामना जिंकून मालिका २-२ अशी बरोबरीत आणण्याचा प्रयत्न करणार आहे. भारताचा कर्णधार रिषभ पंत संघात दोन बदल करण्याची शक्यता आहे. भारताचे फलंदाज लयीत आहेत, तर गोलंदाजांची चिंता सतावत आहे. मागील सामन्यात काही गोलंदाजांनी उत्तम कामगिरी केली होती. चौथ्या सामन्यात अक्षर पटेलच्या जागी रवी बिश्नोई किंवा दीपक हुड्डा यांना अंतिम अकरामध्ये संधी मिळू शकते. आवेश खान मागील तिन्ही सामन्यात विकेट घेण्यात अपयशी ठरला आहे. त्याच्याजागी अर्शदीप सिंगला संधी मिळून तो आतंरराष्ट्रीय पदार्पण करू शकेल.
भारताची सलामीजोडी इशान किशन-ऋतुराज गायकवाड अंतिम अकरामध्ये पक्के आहेत. त्यांंनी मागील सामन्यात प्रत्येकी अर्धशतके करत ९७ धावांची भागीदारी केली होती. इशान या मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये अव्वल क्रमांकावर आहे. त्याने ३ सामन्यात २ अर्धशतकाच्या साहाय्याने १६७ धावा केल्या आहेत. गोलंदाजीत भुवनेश्वर कुमारने कटक आणि विशाखापट्टणमच्या सामन्यांच्या पॉवरप्लेमध्ये चांगल्या इकॉनॉमी रेटने गोलंदाजी करत फलंदाजांना धावा करण्यापासून रोखले आहे.
सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर आतापर्यंत तीन टी२० सामने खेळले आहेत. या तिन्ही सामन्यात १५०च्या वर धावा झाल्या आहेत, म्हणजेच ही फलंदाजी पुरक खेळपट्टी आहे. या खेळपट्टीवर गोलंदाजी अचूक झाली तर गोलंदाजही सामना जिंकून देऊ शकतो. या स्टेडियवर भारताने तीन टी२० सामने खेळले असून दोन सामने दुसऱ्यांदा फलंदाजी करताना जिंकले आहेत. यामुळे नाणेफेकीचा कौल महत्वाचा ठरणार आहे. एक सामना न्यूझीलंड विरुद्ध ४० धावांनी गमावला आहे.
राजकोट येथे कदाचित पाऊस पडला तर सामना रद्दही होऊ शकतो. यामुळे बेंगलोर येथे होणाऱ्या पाचव्या टी२० सामन्यात मालिकेचा निकाल लागेल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
श्रीलंकेचे धमाकेदार पुनरागमन, ऑस्ट्रेलियाविरुद्धची दुसरी वनडे जिंकत मालिकेत साधली बरोबरी
भारताविरुद्धच्या टी२० मालिकेपूर्वीच आयर्लंडच्या कर्णधाराने घेतला धक्कादायक निर्णय, वाचा सविस्तर
‘मी उमरान इतक्या वेगाने गोलंदाजी करू शकत नाही, पण…’ भारतीय गोलंदाजाने उलघडले मनातलं गुपित






