आज भारत विरुद्ध श्रीलंका संघात महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन, गहुंजे येथे तिसरा आणि शेवटचा टी20 सामना होणार आहे. भारताचे लक्ष्य हा सामना जिंकून या वर्षातील प्रथम मालिका जिंकण्यावर असेल.
या सामन्यासाठी भारताच्या 11 जणांच्या संघात शिखर धवन आणि केएल राहुल सलामीवीर म्हणून संघात असू शकतात. शेवटच्या सामन्यात धवनने 32 धावा केल्या तर राहूलने 45 धावा केल्या होत्या.
तसेच मधल्या फळीतील फलंदाजीची जबाबदारी कर्णधार विराट कोहली आणि श्रेयस अय्यरकडे असेल. पण आजच्या सामन्यात कोण तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणार हे पहावे लागेल. कारण इंदोरमध्ये झालेल्या दुसऱ्या टी20मध्ये अय्यरला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवले होते. तर विराट चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला होता.
त्याचबरोबर शिवम दुबे अष्टपैलूच्या भूमिकेत दिसू शकतो. शेवटच्या सामन्यात त्याला फलंदाजीची संधी मिळाली नाही. तसेच रिषभ पंतलाच आज यष्टीरक्षक म्हणून पसंती मिळण्याची दाट शक्यता आहे.
इंदोरमध्ये झालेल्या सामन्यात भारतीय गोलंदाजीना अफलातून कामगिरी केली होती. शार्दुल ठाकूरने 3, नवदीप सैनी आणि कुलदीप यादवने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. तर जसप्रीत बुमराह आणि वॉशिंग्टन सुंदरने प्रत्येकी एक विकेट घेतली. त्यामुळे आजच्या सामन्यासाठी गोलंदाजांच्या फळीत बदल होण्याची शक्यता कमी आहे.
आजच्या सामन्यासाठी असा असू शकतो भारतीय संघ –
विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, रिषभ पंत (यष्टीरक्षक), शिवम दुबे, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर, नवदीप सैनी आणि वॉशिंग्टन सुंदर.





