प्रथमच आयोजित होत असलेल्या आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत भारताचा सामना न्यूझीलंडविरुद्ध होईल. एजबॅस्टन येथे उभय संघांमध्ये १८ ते २२ जून या काळात हा सामना पार पडेल. या महत्त्वपूर्ण सामन्यासाठी तसेच इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा २० सदस्यीय संघ इंग्लंडला पोहोचेल. तत्पूर्वी भारताच्या माजी अष्टपैलू खेळाडूने भारताकडे अनुभवी सलामीवीर नसल्याचे परखडपणे म्हटले आहे.
भारतीय सलामीवीरांकडे अनुभव नाही
भारतासाठी ३ कसोटी व १० वनडे खेळलेल्या अष्टपैलू विजय भारद्वाज यांनी नुकतेच एका मुलाखतीत बोलताना भारतीय संघाविषयी भाष्य केले. ते म्हणाले, “इंग्लंडमध्ये गेलेला संघ कागदावर मजबूत आहे. मात्र तसे पाहायला गेले तर भारताची सलामी जोडी काहीशी कमजोर वाटते. शुबमन गिल याच्याकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा पुरेसा अनुभव नाही आणि रोहित शर्मा इंग्लंडमध्ये कसोटी क्रिकेट खेळला नाही.”
“मधल्या फळीत चेतेश्वर पुजारा, विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यासारखे सक्षम खेळाडू दिसतात. रोहित व गिल कशाप्रकारे सलामी देतात, यावर खूप काही अवलंबून असेल. खेळाडूंनी ४०-५० धावा काढून संतुष्ट होऊ नये,” अशा शब्दात आपले मत मांडले आहे.
विजय भारद्वाज यांनी भारतीय खेळाडूंनी राहुल द्रविड याच्याकडून एकाग्रता शिकण्याची गरज असल्याचेही म्हटले आहे. भारताकडे सलामीवीर म्हणून या अंतिम सामन्यासाठी रोहित शर्मा, शुबमन गिल, केएल राहुल व मयंक अगरवाल असे पर्याय उपलब्ध आहेत.
इंग्लंड दौऱ्यावर जाणारा भारतीय संघ-
विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), चेतेश्वर पुजारा, रोहित शर्मा, केएल राहुल, रिषभ पंत (यष्टीरक्षक), शुबमन गिल, मयंक अगरवाल, हनुमा विहारी, रविंद्र जडेजा, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, उमेश यादव, इशांत शर्मा, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज व वॉशिंग्टन सुंदर.
राखीव खेळाडू- अरझान नागवासवाला, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान, अभिमन्यू ईस्वरन.
महत्त्वाच्या बातम्या-
नको रे बाबा! ‘या’ गोलंदाजापुढे रनमशीन कोहलीलाही फुटायचा घाम, सर्वच फलंदाज होते त्रस्त
खराब फॉर्ममध्ये असलेल्या जड्डूला धोनीकडून मिळाला ‘हा’ गुरुमंत्र, मग चोप चोपल्या धावा
तू कसोटीसाठी सज्ज आहेस; पुजाराच्या शब्दांनी भारावला होता ‘हा’ ३२७ बळी घेणारा गोलंदाज