सोमवारी (14 ऑक्टोबर) भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका महिला वनडे मालिकेतील बडोदा येथे झालेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात भारतीय महिलांनी दक्षिण आफ्रिकेवर 6 धावांनी विजय मिळवला.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसऱ्या वनडे सामन्यांत फिरकीपटूंनी भारतीय संघाच्या कमी धावांचा अतिशय चांगला बचाव केला.
रिलायन्स स्टेडियमवर प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताचा डाव 146 धावांवर संपल्यानंतर भारताच्या एकता बिश्त, दिप्ती शर्मा आणि राजेश्वरी गायकवाड या महिला गोलंदाजांनी चांगली कामगिरी करत दक्षिण आफ्रिकेच्या महिलांना अवघ्या 140 धावांवर बाद केले. त्यामुळे भारताने हा सामना 6 धावांनी जिंकला.
दक्षिण आफ्रिका संघाने 147 धावांचा पाठलाग करत असताना नियमित अंतराने विकेट गमावल्या. यातून सावरण्यास भारतीय गोलंदाजांनी त्यांना कोणतीही संधी दिली नाही.
दक्षिण आफ्रिका संघाच्या मेरीझेन कॅप (29), कर्णधार सून लूस (24) आणि लारा वोल्वार्ड्ट (23) या खेळाडूंना वगळता कुणालाही विशेष योगदान देता आले नाही. यामुळे त्यांचा डाव 48 षटकांत 140 धावांवर संपला.
भारताकडून एकताने 10 षटकांत फक्त 32 धावा देत सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर दिप्ती आणि राजेश्वरी यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.
हरमनप्रीत कौर आणि जेमीमाह रोड्रिगेझ या आपल्या उत्कृष्ट फलंदाजीसाठी ओळखल्या जातात. पण त्यांनीही आज प्रत्येकी एक विकेट घेत भारताला विजय मिळवून देण्यात महत्त्वाचे योगदान दिले.
भारताने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण भारताची सुरूवात काही चांगली झाली नाही. भारताने पहिल्या 2 षटकांतच दोन्ही सलामीवीर फलंदाज गमावले.
कर्णधार मिताली राजने संघसहकारी पुनम राऊत बरोबर टिकून खेळण्याचा प्रयत्न केला. तथापि, दोन्ही सलामीवीर अनुक्रमे 11 आणि 15 धावांवर बाद झाल्या.
त्यानंतर हरमनप्रीत कौर एका बाजूने फलंदाजी धुरा सांभाळत होती. तिने 76 चेंडूत 38 धावा केल्या. याशिवाय, शिखा पांडेने संघाला 146चा लक्षापर्यंत पोहोचण्यासाठी 35 धावांची मौल्यवान खेळी केली.
भारताने पहिले 2 सामने अनुक्रमे 8 आणि 6 विकेट्सने जिंकले होते. त्यामुळे शेवटचा सामना जिंकत संघाने मालिकेत ३-० असा विजय मिळवला.
संक्षिप्त धावफलक :
भारतीय महिला संघ- 146/109 (हरमनप्रीत कौर 38, शिखा पांडे 35 ; मेरीझेन कॅप 3/20)
दक्षिण आफ्रिका महिला संघ- 140/10 (मेरीझेन कॅप 29, सून लूस 24 ; एकता बिश्त 3/32)