---Advertisement---

ऐतिहासिक दिवस-रात्र कसोटीत भारताचा एका डावाने दणदणीत विजय

On: रविवार, नोव्हेंबर 24, 2019 2:11 PM
---Advertisement---

कोलकता। भारत विरुद्ध बांगलादेश संघात इडन गार्डनवर पार पडलेल्या दिवस-रात्र कसोटी सामन्यात भारताने एक डाव 46 धावांनी विजय मिळवला आहे. याबरोबरच 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने 2-0 असा विजयही मिळवला आहे.

या सामन्यात बांगलादेशचा दुसरा डाव 195 धावांवर संपूष्टात आला. त्यामुळे त्यांना या सामन्यात पराभव स्विकारावा लागला.

बांगलादेशकडून दुसऱ्या डावात केवळ मुशफिकुर रहिमने 74 धावांची खेळी करत एकाकी झुंज दिली. त्याला महमुद्दुलाहने 39 धावा करत चांगली साथ दिली होती. पण तो दुखापतग्रस्त झाला. अन्य बांगलादेशच्या फलंदाजांना मात्र खास काही करता आले नाही. भारताकडून उमेश यादवने सर्वाधिक 5 विकेट घेतल्या तर इशांत शर्माने 4 विकेट घेतल्या.

तत्पूर्वी भारताने पहिला डाव 9 बाद 347 धावांवर घोषित करत सामन्यात 241 धावांची मोठी आघाडी घेतली होती. भारताकडून विराट कोहलीने 136 धावांनी शतकी खेळी केली. तर चेतेश्वर पुजाराने 55 आणि अजिंक्य रहाणेने 51 धावांची अर्धशतकी खेळी केली.

बांगलादेशकडून गोलंदाजी करताना अल-अमीन हुसेन आणि इबादत हुसेन यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या, तर अबू जायेदने 2 विकेट्स आणि तैजूल इस्लामने 1 विकेट घेतली आहे.

त्याआधी बांगलादेशचा पहिला डाव 106 धावांवर संपूष्टात आला होता. या डावात बांगलादेशकडून शादमान इस्लाम(29), लिटॉन दास(24) आणि नईम हसन(19) यांनाच दोन आकडी धावसंख्या पार करता आली होती.  तर भारताकडून गोलंदाजीत इशांत शर्माने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. तसेच उमेशने 3 आणि मोहम्मद शमीने 2 विकेट्स घेतल्या.

संक्षिप्त धावफलक – 

बांगलादेश पहिला डाव – सर्वबाद 106 धावा

भारत पहिला डाव – 9 बाद 347 धावा (घोषित)

बांगलादेश दुसरा डाव – सर्वबाद 195 धावा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---