आयपीएल २०२१ चा ५५ वा सामना मुंबई इंडियन्स आणि सनरायझरर्स हैदराबाद यांच्यात खेळला गेला. या सामन्यात मुंबई संघाने हैदराबादच्या गोलंदाजांवर जोरदार आक्रमक निर्धारित २० षटकात २३५ धावांचा डोंगर उभा केला. मुंबई संघाने हैदराबाद संघाला ४२ धावांनी पराभूत केले आहे. याच सामन्यात मुंबईकडून जसप्रीत बुमराहने दोन बळी घेत आयपीएलमध्ये एका विक्रमाची नोंद केली आहे.
बुमराहच्या यंदाच्या आयपीएल हंगामात २१ विकेट्स पूर्ण झाल्या आहेत. त्यामुळे बुमराहने सलग दोन आयपीएल हंगामात २० पेक्षा अधिक बळी घेतले आहे. अशी कामगिरी करणारा तो चौथा भारतीय गोलंदाज बनला आहे. त्याने २०२० आणि २०२१ च्या हंगामात ही कामगिरी केली आहे.
यापूर्वी २०१३ आणि २०१४ मध्ये मोहित शर्माने सर्वात आधी अशी कामगीरी केली होती. तो पहिला भारतीय गोलंदाज होता, ज्याने हा विक्रम नोंदवला होता. त्यांनंतर युजवेंद्र चहल याने २०१५ आणि २०१६ साली, तर भुवनेश्वर कुमार याने २०१६ आणि २०१७ साली हा विक्रम नोंदवला होता.
या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय मुंबईचा सलामीवीर इशान किशनने सार्थ ठरवला. त्याने पहिल्या चेंडूपासून हैदराबादच्या गोलंदाजांवर जबरदस्त हल्ला चढवला. इशानने कर्णधार रोहित शर्माच्या साथीने ५.२ षटकात ८० धावांची सलामी दिली. यामध्ये रोहितचं योगदान केवळ १८ धावांचं होतं. रोहितला राशिद खानने बाद केले. त्यानंतर आलेला हार्दिक पांड्या अवघ्या १० धावांवर बाद झाला.
हार्दिकनंतर कायरन पोलार्ड १३ धावांचं योगदान देऊन तंबूत परतला. मात्र इशान किशनने एक टोक लावून धरत प्रत्येक गोलंदाजाची धुलाई सुरुच ठेवली. त्याने अवघ्या ३२ चेंडूत ८४ धावांची खेळी केली. या खेळीत ११ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता.
ईशान बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादवने सामन्याची सूत्र आपल्या हाती घेतली. त्याने देखील हैदराबादच्या गोलंदाजांवर जबरदस्त हल्लाबोल केला. सूर्यकुमारने ४० चेंडूत ८२ धावांची खेळी केली. या खेळीत ११ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. या दोघांव्यतिरिक्त मुंबईच्या कोणत्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही.
ईशान आणि सूर्यकुमारच्या खेळीच्या जोरावर मुंबईने निर्धारित २० षटकात ९ गड्यांच्या बदल्यात २३५ धावांचा डोंगर उभा केला. नंतर हैदराबाद संघ २० षटकात ८ बाद १९३ धावा करू शकला आणि मुंबईचा ४२ धावांनी विजय झाला.
महत्त्वाच्या बातम्या –
मुंबईच्या फलंदाजांनी सनरायझर्सचा उडवला धुव्वा, संघाला गाठून दिली आजपर्यंतची सर्वोच्च धावसंख्या
हायवोल्टेज ड्रामा! आयपीएल इतिहासातील सर्वात रोमांचक झालेले तीन अंतिम सामने
डीआरएस असता तर आणखी किती विकेट्स झाल्या असत्या? व्हि़डिओ शेअर करत वॉर्नने मारली कोपरखळी