भारतीय संघ आशिया चषक 2023 स्पर्धा गाजवत आहे. भारताने सुपर- 4 फेरीतील तिसऱ्या सामन्यात पाकिस्तान आणि चौथ्या सामन्यात श्रीलंका यांसारख्या बलाढ्य संघांना धोबीपछाड दिला. भारतीय संघाला श्रीलंकेविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना संघर्ष करावा लागला होता. भारताची धावसंख्या अवघी 213 इतकी होती. मात्र, तरीही भारतीय गोलंदाजांनी शानदार प्रदर्शन करत श्रीलंकेला 172 धावांवर सर्वबाद केले आणि 41 धावांनी विजय मिळवला. या विजयानंतर भारतीय संघ थेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहोचला. भारताच्या शानदार विजयानंतर कर्णधार रोहित शर्मा भलताच खुश झाला. त्याने आपल्या गोलंदाजांवर स्तुतीसुमने उधळली.
काय म्हणाला रोहित?
कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने श्रीलंकेविरुद्ध 41 धावांनी विजय मिळवल्यानंतर मोठे विधान केले. रोहित म्हणाला, “चांगला सामना होता. आमच्यासाठी अशा आव्हानात्मक खेळपट्टीवर दबावात असा सामना खेळणे गरजेचे आहे. अनेक कारणांमुळे हे आव्हानात्मक राहिले. निश्चितरीत्या आम्ही काय करू शकतो, हे पाहण्यासाठी आम्हाला अशाप्रकारच्या खेळपट्टीवर खेळावे वाटेल.”
हार्दिक पंड्याचे कौतुक
रोहितने उपकर्णधार हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याच्या गोलंदाजीचेही कौतुक केले. 5 षटकात 14 धावा खर्चून पंड्याने 1 विकेट नावावर केली. पंड्याच्या गोलंदाजीचे कौतुक करत रोहित म्हणाला, “त्याने मागील काही वर्षांमध्ये आपल्या गोलंदाजीवर खूप मेहनत घेतली आहे. हे एका रात्रीत होत नाही आणि हे पाहणे सुखद आहे. असे वाटत होते की, तो प्रत्येक चेंडूवर विकेट घेत आहे. आव्हानाचा बचाव करणे सोपे नव्हते. कारण, शेवटी खेळपट्टी सहज झाली होती. आम्ही एक लाईन पकडून गोलंदाजी केली. मला वाटते की, आम्ही खूप चांगले प्रदर्शन केले.”
कुलदीपला का मिळाले यश?
भारतासाठी कुलदीप यादव (Kuldeep Yadav) याने 24 तासांत सर्वाधिक 9 विकेट्स घेतल्या आहेत. रोहितने त्याच्या यशाचे रहस्य सांगितले. तो म्हणाला, “मागील एक वर्षापासून तो चांगली गोलंदाजी करत आहे. त्याने आपल्या लयीवर खूप मेहनत घेतली आहे. तो परतला आहे आणि त्याने स्वत:वर काम केले आहे. चेंडू चांगल्याप्रकारे हातातून सुटत आहे आणि तुम्ही मागील 10 वनडे सामन्यांमधील परिणाम पाहू शकता.”
सामन्याविषयी बोलायचं झालं, तर भारताकडून फक्त रोहित शर्मा याला अर्धशतक झळकावता आहे. तसेच, गोलंदाजी करताना कुलदीप यादवने श्रीलंकेविरुद्ध 9.3 षटके गोलंदाजी करताना 43 धावा खर्चून सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. 11 सप्टेंबर रोजी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याने 5 विकेट्स घेतल्या होत्या. आता भारताचा पुढील सामना बांगलादेशविरुद्ध शुक्रवारी (दि. 15 सप्टेंबर) कोलंबो (Colombo) येथील आर प्रेमदासा स्टेडिअम (R Premdasa Stadium) येथेच खेळला जाणार आहे. (indian captain rohit sharma statement after reaching final india vs sri lanka asia cup 2023)
हेही वाचा-
VIDEO: कसाय फिटनेस? सूर मारतच कॅप्टन रोहितने टिपला झेल, विराटने मारली जादूची झप्पी
श्रीलंकेचा विजयरथ थांबला! दणदणीत विजयासह टीम इंडिया आशिया कप फायनलमध्ये