इंग्लंड दौऱ्यावर भारतीय संघाची सुरुवात खूपच वाईट झाली, इंग्लंडने पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा 5 विकेट्सने पराभव केला. इंग्लंड संघाने 350 पेक्षा जास्त धावांचे लक्ष्य अगदी सहज गाठले. भारताने पहिल्या डावात 471 धावा आणि दुसऱ्या डावात 364 धावा केल्या. तरीही, गोलंदाजांच्या खराब कामगिरीमुळे टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. संघ मालिकेत 0-1ने मागे आहे. आता मालिकेतील दुसरा सामना 2 जुलैपासून बर्मिंगहॅमच्या मैदानावर खेळला जाईल, परंतु येथे टीम इंडियाचा रेकॉर्ड खूपच खराब आहे आणि आजपर्यंत त्यांनी या मैदानावर एकही कसोटी सामना जिंकलेला नाही.
भारतीय क्रिकेट संघाने बर्मिंगहॅमच्या मैदानावर आतापर्यंत एकूण 8 कसोटी सामने खेळले आहेत, त्यापैकी एक कसोटी अनिर्णित राहिली आणि संघाने 7 सामने गमावले आहेत. भारतीय संघाने 1967 मध्ये बर्मिंगहॅमच्या मैदानावर पहिला कसोटी सामना खेळला होता, ज्यामध्ये त्यांचा 132 धावांनी पराभव झाला होता, त्यावेळी भारतीय संघाचे कर्णधार मन्सूर अली खान पतौडी होते. भारतीय संघाने 2022 मध्ये या मैदानावर शेवटचा कसोटी सामना खेळला होता, ज्यामध्ये जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला 7 विकेट्सनी पराभव पत्करावा लागला होता.
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाच्या फलंदाजांनी चांगली कामगिरी केली होती. भारताकडून रिषभ पंतने दोन्ही डावात शतके झळकावली होती. पंतने पहिल्या डावात 134 आणि दुसऱ्या डावात 118 धावा केल्या होत्या. त्याच्याशिवाय यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल आणि केएल राहुल यांनीही शतके झळकावली होती. गोलंदाजांच्या खराब कामगिरीमुळे संघाचा पराभव झाला.
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या डावात जसप्रीत बुमराहने पाच विकेट्स घेतल्या. पण त्याला उर्वरित गोलंदाजांकडून पाठिंबा मिळाला नाही. दुसऱ्या डावात बुमराहची जादूही चालली नाही आणि भारतीय गोलंदाज इंग्लिश फलंदाजांविरुद्ध वाईटरित्या अपयशी ठरले. इंग्लंडने लक्ष्य सहज गाठले. दुसऱ्या डावात इंग्लंडकडून बेन डकेटने 149 धावांची खेळी केली.