मुंबई | ३० मे पासून इंग्लंडमध्ये १२व्या क्रिकेट विश्वचषकाला सुरुवात होत आहे. यासाठी भारतीय संघ २२ मे रोजी रवाना होणार आहे. यापुर्वीच काही संघ इंग्लंडमध्ये रवाना झाले असून भारतीय संघ आयपीएलनंतर दोन आठवड्यांनी इंग्लंडला रवाना होत आहे.
१५ सदस्यीय भारतीय संघातील १४ खेळाडू यावेळी रवाना होणार असून केदार जाधवबद्दल मात्र शंका व्यक्त केली जात आहे. भारतीय संघ मुंबईमधून २२मे रोजी सकाळी इंग्लंडला रवाना होणार आहे.
भारताचा 2019 विश्वचषकातील पहिला सामना 5 जूनला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. त्याआधी भारतीय संघ 25 मे ला न्यूझीलंड विरुद्ध ओव्हल मैदानावर तर 28 मे ला बांगलादेश विरुद्ध कार्डिफ वेल्स स्टेडियमवर सराव सामने खेळणार आहे.
भारतीय संघ यावेळी विश्वचषकाचा प्रबळ दावेदार असून जगातील सर्वोत्तम फलंदाज विराट कोहली आणि जगातील सर्वोत्तम गोलंदाज जसप्रीत बुमराह भारतीय संघात आहे. तर स्फोटक फलंदाज रोहित शर्मा आणि शिखर धवनवर संघाच्या फलंदाजीची मुख्य मदार असणार आहे.
तसेच विश्वचषकासाठी निवडण्यात आलेल्या या १५ जणांच्या भारतीय संघात एमएस धोनीसह दिनेश कार्तिकला पर्यायी यष्टीरक्षक म्हणून संधी देण्यात आली आहे. त्याचबरोबर शिखर धवन आणि विजय शंकरचीही या भारतीय संघात निवड करण्यात आली आहे.
या भारतीय संघात अष्टपैलू म्हणून केदार जाधव, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा यांना संधी मिळाली आहे.
फिरकी गोलंदाजामध्ये कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल यांची निवड करण्यात आली आहे. त्याचबरोबर वेगवान गोलंदाजांच्या फळीत जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी यांना संधी मिळाली आहे.
असा आहे 2019 विश्वचषकासाठी भारतीय संघ-
विराट कोहली(कर्णधार), रोहित शर्मा(उपकर्णधार ), शिखर धवन, केएल राहुल, दिनेश कार्तिक,केदार जाधव, एमएस धोनी, हार्दिक पंड्या, विजय शंकर,रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.