न्यूझीलंडविरुद्धच्या टी२० मालिकेनंतर भारतीय संघ कसोटी मालिका खेळणार आहे. ही कसोटी मालिका जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा भाग असणार आहे. २५ नोव्हेंबरपासून ग्रीनपार्क स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या भारत-न्यूझीलंड कसोटी सामन्यासाठी भारतीय क्रिकेट संघाचे ११ सदस्य शुक्रवारी (१९ नोव्हेंबर) शहरात दाखल झाले. उत्तर प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या अधिकार्यांनी विमानतळावरील पोलीस आणि आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांसह त्यांना सुरक्षित वातावरणात बसमधून हॉटेलमध्ये आणले. येथे सर्व खेळाडूंना हॉटेलच्या सतराव्या मजल्यावर तीन दिवस क्वारंटाईन करण्यात आले. त्याचवेळी लखनौ येथून अष्टपैलू रवींद्र जडेजा देखील वाहनाने हॉटेलवर पोहचला.
कर्णधार अजिंक्य रहाणेसह उपकर्णधार चेतेश्वर पुजारा, मयंक अगरवाल, शुबमन गिल, वृद्धिमान साह, केएस भरत, जयंत यादव, इशांत शर्मा, उमेश यादव आणि प्रसिद्ध कृष्णा यांना बसने चकेरी विमानतळावरून आणण्यात आले. विमानतळावरील पोलीस आणि आरोग्य विभागाच्या पथकासह यूपीसीएचे स्थानिक व्यवस्थापक आलोक गुप्ता आदींनी त्यांना विमानतळावरून हॉटेलमध्ये नेले. रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या लोकांनी खेळाडूंचे स्वागत केले. त्याचवेळी चकेरी विमानतळ आणि हॉटेलच्या बाहेर क्रीडाप्रेमी क्रिकेटपटूंची एक झलक पाहण्यासाठी हातात तिरंगा घेऊन दाखल झाले होते.
पोलिसांनी कोणालाही बसजवळ जाऊ दिले नाही. खेळाडूंनी दुरूनच हात हलवत अभिवादन स्वीकारले. हॉटेलबाहेर पोहोचल्यावर हॉटेल व्यवस्थापनाने दुरूनच आरती करून खेळाडूंचे स्वागत केले. क्रिकेटपटूंसाठी सतराव्या मजल्यावरची लिफ्ट हॉटेल व्यवस्थापनाने आधीच आरक्षित केली होती. तेथे त्यांची व्यवस्था असे कर्मचारी पाहतील, जे आधीच विलगीकरण आणि तपासणी प्रक्रियेतून गेले आहेत. दुसरीकडे, संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा शुक्रवारी (१९ नोव्हेंबर) लखनौ विमानतळावर उतरला. तिथे आधीच उपस्थित असलेल्या कानपूर क्रिकेट असोसिएशनच्या उपाध्यक्षा आणि न्यूझीलंड संघाच्या स्थानिक व्यवस्थापक अश्विनी कोहली यांनी त्यांना वाहनाने शहरात आणले.
स्थानिक व्यवस्थापक आणि कानपूर क्रिकेट असोसिएशनचे सचिव आलोक गुप्ता यांनी सांगितले की, खेळाडू हॉटेलमध्ये तीन दिवस क्वारंटाइनचा कालावधी पूर्ण करतील. हे ११ खेळाडू बायो बबलमध्ये २२ नोव्हेंबरला येणार्या उर्वरित भारतीय संघासह सामील होतील. यानंतर भारत आणि न्यूझीलंडचे संघ २३ आणि २४ नोव्हेंबर रोजी ग्रीनपार्क येथे सराव करतील. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करत यावेळी क्रिकेटपटूंना कोणालाही भेटण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. हॉटेलमध्येही खेळाडू एकमेकांच्या थेट संपर्कात राहणार नाहीत. ते एकमेकांशी फोनवरूनच बोलतील.