नागपूर। रविवारी (१० नोव्हेंबर) भारत विरुद्ध बांगलादेश(India vs Bangladesh) संघात पार पडलेल्या तिसऱ्या आणि निर्णायक टी२० सामन्यात(3rd T20I) भारताने ३० धावांनी विजय मिळवला. या विजयाबरोबरच भारताने ३ सामन्यांची टी२० मालिका २-१ अशा फरकाने जिंकली आहे.
या सामन्यात भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहलने(Yuzvendra Chahal) १ विकेट घेतली. याबरोबरच त्याने एक खास पराक्रम केला आहे. चहलने रविवारी बांगलादेशचा कर्णधार महमुद्दुलाहला त्रिफळाचीत केले आणि आंतरराष्ट्रीय टी२० कारकिर्दीतील ५० विकेट्स घेण्याचा टप्पा पार केला.
हा टप्पा पार करणारा तो भारताचा केवळ तिसरा क्रिकेटपटू ठरला आहे. याआधी आर अश्विन (R Ashwin) आणि जसप्रीत बुमराह(Jasprit Bumrah) या भारतीय गोलंदाजांनी आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये ५० विकेट्स(50 T20I Wickets) घेण्याचा टप्पा पार केला आहे.
तसेच चहलने त्याच्या ५० विकेट्स ३४ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे तो आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये सर्वात जलद ५० विकेट्सचा टप्पा पार करणारा भारतीय गोलंदाजही ठरला आहे. तर जगातील चौथ्या क्रमांकाचा सर्वात जलद ५० आंतरराष्ट्रीय टी२० विकेट्सचा(Fastest to 50 T20I Wickets)टप्पा गाठणारा गोलंदाज ठरला आहे.
त्याने हा कारनामा करताना दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज गोलंदाज डेल स्टेनला मागे टाकले आहे. स्टेनने ३५ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात ५० विकेट्स घेण्याचा टप्पा पार केला होता.
तसेच भारतीय गोलंदाजांमध्ये चहलने अश्विन आणि बुमराहला मागे टाकले आहे. बुमराहने ४१ सामन्यात तर अश्विनने ४२ सामन्यात ५० आंतरराष्ट्रीय टी२० विकेट्सचा टप्पा पार केला होता.
#आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये सर्वात जलद ५० विकेट्स घेणारे भारतीय –
३४ सामने – युजवेंद्र चहल
४१ सामने – जसप्रीत बुमराह
४२ सामने – आर अश्विन
#आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये सर्वात जलद ५० विकेट्स घेणारे गोलंदाज –
२६ सामने – अजंता मेंडिस
३१ सामने – इम्रान ताहिर/ राशिद खान
३३ सामने – मुस्तफिजूर रेहमान
३४ सामने – युजवेंद्र चहल
३५ सामने – डेल स्टेन






