भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसरा वनडे सामना मंगळवारी (२० जुलै) आर प्रेमदासा स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने ३ गडी राखून विजय मिळवला आणि वनडे मालिकेत २-० ने विजयी आघाडी घेतली आहे. या सामन्यात दीपक चाहर याने नाबाद अर्धशतकी खेळी करत अखेरपर्यंत झुंज दिली. तसेच सूर्यकुमार यादवने ही आपले पहिले वहिले वनडे अर्धशतक झळकावले. भारताच्या युवा ब्रिगेडचा हा विजय हॉटेलमध्ये जल्लोषात साजरा करण्यात आला. ज्याचा व्हिडिओ सूर्यकुमार यादवने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.
युवा भारतीय संघाने श्रीलंका संघाला त्यांच्याच मायदेशात जाऊन पराभूत करण्याचा पराक्रम केला. याचाच जल्लोष म्हणून भारतीय संघातील युवा खेळाडू इशान किशन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या आणि इतर खेळाडू गाणं गाताना दिसून आले आहेत. सूर्यकुमार यादवने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये हे खेळाडू ‘गँगस्टर’ चित्रपटातील प्रसिध्द गाणं, ‘ना जाने कोई, कैसी है ये जिंदगानी’ गाताना दिसून येत आहेत.
https://www.instagram.com/p/CRkU-8GjeBd/
या सामन्यात श्रीलंका संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. श्रीलंका संघाकडून चरिथ असलंकाने ६८ चेंडूत सर्वाधिक ६५ धावांची खेळी केली. या दरम्यान त्याने ६ चौकार लगावले होते. तसेच अविष्का फर्नांडोने ५० धावांची खेळी केली, तर करूणारत्नेने ३३ चेंडूत ५ चौकारांच्या साहाय्याने ४४ धावांचे योगदान दिले होते. श्रीलंका संघाला ५० षटकाअखेर ९ बाद २७५ धावा करण्यात यश आले होते. भारताकडून भुवनेश्वर कुमार आणि युजवेंद्र चहलने प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या होत्या आणि दीपक चाहरे २ विकेट घेतल्या होत्या.
दीपक चाहरचा ‘कहर’
श्रीलंका संघाने दिलेल्या २७६ धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाला चांगली सुरुवात मिळाली नव्हती. पृथ्वी शॉ लवकर माघारी परतला होता. तर, शिखर धवन अवघ्या २९ धावा करत पॅव्हेलियनमध्ये परतला होता. या दरम्यान मनीष पांडे ३७ आणि सूर्यकुमार यादवने ५३ धावांचे योगदान दिले होते. परंतु, श्रीलंका संघातील गोलंदाजांनी भारतीय संघातील फलंदाजांना नियमित अंतराने एक माघारी धाडले होते.त्यामुळे १९३ धावांत ७ गडी बाद अशी भारताची अवस्था झाली होती.
यावेळी दीपक चाहरेने भुवनेश्वर कुमारसह ८ व्या विकेटसाठी नाबाद ८४ धावांची भागीदारी रचली आणि भारताला बिकट परिस्थितीतून बाहेर काढत विजय मिळवून दिला. दीपक चाहरने नाबाद ६९ आणि भुवनेश्वर कुमारने नाबाद १९ धावा केल्या. श्रीलंकेकडून वनिंदू हसरंगाने सर्वाधिक ३ गडी बाद केले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
धोनीने लिहिली धवनसेनेच्या वनडे मालिका विजयाची गाथा! भुवनेश्वर अन् दिपकला ‘असे’ केले तयार