नुकत्याच ऍडलेड येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने ८ विकेट्सने भारतीय संघाला नमवले. या सामन्यातील लाजिरवाण्या कामगिरीनंतर भारतीय संघ पुढील सामन्यात पराभवाचा वचपा काढण्याच्या दृष्टीने तयारीला लागला आहे. भारतीय संघाचा नियमित कर्णधार विराट कोहली पहिल्या सामन्यानंतर पालकत्व रजा घेतल्याने भारतात परतणार आहे. तसेच वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर झाला आहे. त्यामुळे ‘बॉक्सिंग डे’ सामन्यासाठी भारतीय संघ ११ जणांच्या संघात काही मोठे बदल करण्याची दाट शक्यता आहे.
२६ डिसेंबर ते ३० डिसेंबर दरम्यान मेलबर्न येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉक्सिंग डे कसोटी सामना होणार आहे. जर भारतीय संघाने हा सामना जिंकल्यास मालिकेत १-१ ने बरोबरी होईल.
पहिल्या कसोटी सामन्यातील पराभवामुळे होऊ शकतात बदल
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, पहिल्या सामन्यातील लज्जास्पद पराभवानंतर भारताच्या संघ व्यवस्थापनाने अंतिम ११ जणांच्या संघात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच विराट आणि शमी यांच्या अनुपस्थितीमुळे त्यांना संघात बदल करणे अनिवार्य झाले.
दुसऱ्या कसोटी सामन्यात यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुल, रिषभ पंत, युवा फलंदाज शुबमन गिल आणि अष्टपैलू रविंद्र जडेजा यांना संधी देण्यात येण्याची दाट शक्यता आहे. तर दुखापतग्रस्त शमीची जागा मोहम्मद सिराज किंवा नवदीप सैनी घेईल.
पृथ्वी शॉच्या खराब फॉर्ममुळे राहुलला संधी
याविषयी बोलताना बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले की, “सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉ याच्या जागी राहुलला संधी दिली जाईल. क्रिकेटमध्ये खेळाडूचा फॉर्मच सर्वकाही असतो. युवा फलंदाज पृथ्वी शॉ पहिल्या कसोटी सामन्यात सपशेल फ्लॉप ठरला. त्याच्या फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण विभागातील खराब प्रदर्शनाने सिद्ध करून दाखवले की, तो सध्या कसोटी क्रिकेट खेळण्यास पूर्णपणे सज्ज नाही. अशात फॉर्ममध्ये असलेल्या राहुलला संधी देणे हा योग्य निर्णय आहे. याबरोबरच भारतात परत गेलेल्या विराटची जागा शुबमन घेईल.”
जडेजामुळे संघ अधिक मजबूत
“अष्टपैलू जडेजा दुखापतीतून पूर्णपणे बरा झाल्यामुळे हनुमा विहारीऐवजी त्याला खेळवण्यात येईल. जडेजाला संधी दिल्यामुळे भारतीय संघाला सहाव्या क्रमांकावर अष्टपैलू खेळाडू उपलब्ध होईल. त्यामुळे संघ आता पाच गोलंदाजांसह खेळेल. दूसरीकडे जडेजा उत्कृष्ट क्षेत्ररक्षकही आहे, म्हणून संघाचे क्षेत्ररक्षणातील प्रदर्शनही सुधारेल. याव्यतिरिक्त यष्टीरक्षक फलंदाज वृद्धिमान साहाला बाहेर करून पंत त्याची जागा घेईल. सिराज आणि सैनी पुर्वीपासूनच बीसीसीआयने कसोटी सामन्यासाठी निवडलेल्या संघाचा भाग होते. त्यामुळे ते दोघेही सध्या ऑस्ट्रेलियामध्ये आहेत. अशात आम्हाला शमीचा बदली खेळाडू मागण्याची गरज पडली नाही,” असे पुढे बोलताना बीसीसीआय अधिकारीने सांगितले.
असा असेल संभाव्य भारतीय संघ
केएल राहुल, मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, शुबमन गिल, अजिंक्य रहाणे (कर्णधार), रविंद्र जडेजा, रिषभ पंत (यष्टीरक्षक), आर अश्विन, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, नवदीप सैनी किंवा मोहम्मद सिराज
महत्त्वाच्या बातम्या-
टीम इंडियासाठी ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेत पुनरागमन करणे कठीण, पाहा काय सांगते आकडेवारी
ऍडलेड कसोटी सामन्यात का घातले होते शमीने फाटलेले शूज? ऑस्ट्रेलियन दिग्गजाने सांगितले कारण