आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचा प्रवास संपला आहे. भारतीय संघाने सलग २ सामन्यात विजय मिळवला असला तरीदेखील सुरुवातीच्या २ सामन्यात पराभूत होण्याचा फटका भारतीय संघाला बसला आहे. गेल्या ९ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच भारतीय संघावर अशी वेळ आहे, ज्यात त्यांना आयसीसी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत देखील प्रवेश करता आला नाहीये.
२०१३ ची चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा वगळता भारतीय संघाने आयसीसीच्या आतापर्यंत झालेल्या प्रत्येक स्पर्धेत उपांत्य फेरी गाठली आहे. परंतु त्यांना या स्पर्धेत जेतेपद मिळवता आलेले नाही.
आयसीसी टी-२० विश्वचषक २०१२
आयसीसी टी-२० विश्वचषक २०१४ स्पर्धा श्रीलंकेत आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत वेस्ट इंडिज संघाने जेतेपद मिळवले होते. भारतीय संघाने या स्पर्धेत अफगानिस्तान संघाला पराभूत केले होते. परंतु त्यानंतर भारतीय संघाला ऑस्ट्रेलिया संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर पुढील सामन्यांमध्ये भारतीय संघाने दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान संघाला पराभूत केले होते. परंतु नेट रन रेटच्या जोरावर पाकिस्तान संघ पुढे निघून गेला आणि भारतीय संघाला उपांत्य फेरीत प्रवेश करता आला नव्हता.
चॅम्पियन्स ट्रॉफी २०१३
आयसीसी टी-२० विश्वचषक २०१२ नंतर झालेल्या पराभवानंतर भारतीय संघाने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०१३ स्पर्धेत जोरदार पुनरागमन केले होते. एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने अंतिम सामन्यात इंग्लंड संघाला पराभूत केले होते.
टी-२० विश्वचषक २०१४
टी-२० विश्वचषक २०१४ स्पर्धा बांगलादेशमध्ये आयोजित करण्यात आली होती. पहिल्याच सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तान संघावर जोरदार विजय मिळवला होता. ग्रूप स्टेजमध्ये सर्व सामने जिंकून भारतीय संघ गुणतालिकेत सर्वोच्च स्थानी होता. त्यानंतर उपांत्य फेरीच्या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाला ६ गडी राखून पराभूत करत भारतीय संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला होता. परंतु अंतिम सामन्यात श्रीलंका संघाने भारतीय संघाला ६ गडी राखून पराभूत केले होते.
आयसीसी विश्वचषक २०१५
आयसीसी विश्वचषक २०१५ स्पर्धेचे यजमानपद संयुक्तरीत्या ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड संघाकडे होते. या स्पर्धेतील अंतिम सामना मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर पार पडला होता. या स्पर्धेत ऑस्ट्रेलिया संघाने जेतेपद मिळवले होते. भारतीय संघाला या सामन्यात उपांत्य फेरीत पराभवाचा सामना करावा लागला होता.
आयसीसी टी-२० विश्वचषक २०१६
आयसीसी टी-२० विश्वचषक २०१६ स्पर्धेचे आयोजन भारतात करण्यात आले होते. या स्पर्धेतील अंतिम सामना कोलकाताच्या मैदानावर वेस्ट इंडिज आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये पार पडला होता. या स्पर्धेत वेस्ट इंडिज संघाने इंग्लंड संघाला पराभूत करत जोरदार विजय मिळवला होता. या स्पर्धेत देखील भारतीय संघाला उपांत्य फेरीत पराभवाचा सामना करावा लागला होता.
चॅम्पियन्स ट्रॉफी २०१७
भारतीय संघाने २०१३ चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत विजय मिळवल्यानंतर २०१७ मध्ये देखील अप्रतिम कामगिरी केली होती. परंतु अंतिम सामन्यात भारतीय संघाला पाकिस्तान संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता.
आयसीसी विश्वचषक २०१९
आयसीसी विश्वचषक २९१९ स्पर्धेचे आयोजन इंग्लंडमध्ये करण्यात आले होते. अंतिम सामन्यात इंग्लंडने सुपर ओव्हरमध्ये न्यूझीलंडचा पराभव करून प्रथमच विजेतेपद पटकावले. या स्पर्धेतही भारताने उपांत्य फेरीपर्यंतचा प्रवास केला होता.
विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा २०२१
यावर्षी आयोजित करण्यात आलेल्या विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. तर न्यूझीलंड संघाने जेतेपद पटकावले होते. भारतीय संघाने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना २१७ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघाने २४९ धावा करत ३२ धावांची आघाडी घेतली होती. त्यानंतर भारतीय संघाचा डाव अवघ्या १७० धावांवर संपुष्टात आला होता. त्यामुळे न्यूझीलंड संघाला विजयासाठी १३९ धावांचे आव्हान मिळाले होते. या धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघाने ८ गडी राखून विजय मिळवला होता.
आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१
यूएई आणि ओमानमध्ये सुरू असलेल्या आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचा प्रवास संपुष्टात आला आहे. भारतीय संघाला पाकिस्तान आणि न्यूझीलंड संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर पुढील सामन्यात भारतीय संघाने सलग २ सामन्यात विजय मिळवला. परंतु अफगानिस्तान संघ पराभूत झाल्यामुळे भारतीय संघाला उपांत्य फेरीत प्रवेश करता आला नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
कोहली, शास्त्री अन् आयसीसी ट्रॉफी, एक न सुटणारं गणित; सलग तिसऱ्या टूर्नामेंटमध्ये झालीय निराशा
पत्नी सानियाने केले चीयर, मग काय शोएबने पाकिस्तानसाठी ठोकले सर्वात वेगवान टी२० अर्धशतक- VIDEO