जवळपास तीन आठवडे चाललेलं पॅरिस ऑलिम्पिकची अखेर सांगता झाली आहे. भारतीय कुस्तीपटू अमन सेहरावतनं चमकदार कामगिरी करत कांस्यपदक जिंकलं. त्यानं पुरुषांच्या फ्रीस्टाइल 57 किलो वजनी गटात पोर्तो रिकोच्या डॅरिएन टोई क्रुझचा 13-5 असा पराभव केला. ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारा अमन हा सातवा भारतीय कुस्तीपटू आहे. ऑलिम्पिकमध्ये या खेळात भारतीय सातत्यानं चांगली कामगिरी करत आहेत.
भारताला कुस्तीत सलग पाचव्या ऑलिम्पिकमध्ये पदक मिळालं आहे. हा सिलसिला 2008 च्या बीजिंग ऑलिम्पिकपासून सुरू झाला. त्यानंतर लंडन, रिओ, टोकियो आणि पॅरिसमध्येही भारतीय कुस्तीपटूंनी धुमाकूळ घातला. भारतानं ऑलिम्पिकमध्ये हॉकीनंतर कुस्तीमध्ये सर्वाधिक पदकं जिंकली आहेत. आतापर्यंत भारतानं हॉकीमध्ये एकूण 13 तर कुस्तीमध्ये 8 पदकं जिंकली आहेत.
1952 हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये खशाबा जाधव यांनी कुस्तीमधील भारताचं पहिलं पदक जिंकलं. त्यानंतर तब्बल 56 वर्षांनी बीजिंग ऑलिम्पिकमध्ये (2008) भारताला कुस्तीत पदक मिळालं. सुशील कुमारनं कांस्यपदक जिंकलं होतं. यानंतर सुशील कुमारनं लंडन ऑलिम्पिक (2012) मध्ये रौप्य पदकाची कमाई केली होती. यासह तो ऑलिम्पिक पदकं जिंकणारा पहिला भारतीय ठरला. याच ऑलिम्पिकमध्ये योगेश्वर दत्तनं कांस्य पदक जिंकलं.
रिओ ऑलिम्पिक 2016 मध्ये साक्षी मलिकला महिलांच्या 58 किलो वजनी गटात कांस्यपदक मिळालं. यासह ती कुस्तीमध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली. त्यानंतर 2020 टोकिया ऑलिम्पिकमध्ये रवी कुमार दहियानं चमकदार कामगिरी करत रौप्य पदक जिंकलं. याच ऑलिम्पिकमध्ये बजरंग पुनियानं भारताला कांस्यपदक मिळवून दिलं.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचे सहा कुस्तीपटू आखाड्यात होते. यांपैकी अमन सेहरावतनं 57 किलो वजनी गटात कांस्यपदकाची कमाई केली. अमन व्यतिरिक्त विनेश फोगट, अंतिम पंघल, अंशू मलिक, निशा दहिया आणि रितिका हुडा यांनी भाग घेतला होता. विनेश फोगटला अंतिम फेरी गाठण्यात यश आलं. मात्र, अंतिम सामन्यापूर्वी वजन 100 ग्रॅम जास्त भरल्यानं तिला अपात्र ठरवण्यात आलं. विनेशच्या रौप्य पदक प्रकरणाचा निकाल 13 ऑगस्टला अपेक्षित आहे. हा निकाल विनेशच्या बाजूनं लागल्यास कुस्तीमध्ये भारताच्या खात्यात आणखी एक रौप्य पदक जमा होईल.
हेही वाचा –
पॅरिस ऑलिम्पिकचा समारोप! कोणत्या देशानं जिंकले सर्वाधिक पदकं? भारत पदकतालिकेत कितव्या स्थानी राहिला
38 वर्षांनंतर प्रथमच भारतीय खेळाडू ठरले अयशस्वी! या वर्षात एकदिवसीय क्रिकेटमध्ये नाही एकही शतक
ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा कसा होणार फायदा? माजी दिग्गजाने सांगितले समीकरण