उद्यापासून(10 ऑक्टोबर) भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात दुसरा कसोटी सामना सुरु होणार आहे. हा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडीयम, गहुंजे येथे होणार आहे. या सामन्याला उद्या भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 9.30 वा सुरुवात होईल.
भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 असा आघाडीवर आहे. भारताने विशाखापट्टणमला झालेल्या पहिल्या कसोटीत 203 धावांनी विजय मिळवला होता.
त्यामुळे पुण्यात होणाऱ्या दुसऱ्या कसोटीत विजय मिळवून मालिकेत 2-0 अशी आघाडी घेण्याची भारतीय संघाला संधी आहे. तर मालिकेत 1-1 अशी बरोबरी करण्याची दक्षिण आफ्रिकेला संधी आहे.
या सामन्यासाठी असा असू शकतो 11 जणांचा संभाव्य भारतीय संघ –
सलामीवीर – मयंक अगरवाल आणि रोहित शर्मा
मयंक आणि रोहितने विशाखापट्टणमला पहिल्यांदाच कसोटीत एकत्र सलामीला फलंदाजी केली होती. या दोघांनीही पहिल्या कसोटीत दमदार कामगिरी करताना पहिल्या डावात 317 धावांची मोठी भागीदारीही रचली होती.
या सामन्यात मयंकने पहिल्या डावात 215 धावांची द्विशतकी खेळी केली होती. तर रोहितने या सामन्यातील दोन डावात अनुक्रमे 176 आणि 127 धावांची शतकी खेळी केली होती. त्यांच्या या कामगिरीनंतर ते दुसऱ्या कसोटीसाठीही भारताच्या अंतिम 11 जणांच्या संघात सलामीवीर म्हणून मयंक आणि रोहित कायम राहतील याची दाट शक्यता आहे.
मधली फळी – चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे
रोहित आणि मयंकने पहिल्या कसोटीतील पहिल्या डावात चांगली सुरुवात दिल्यानंतरही भारताची मधली फळी कोलमडली होती. पण दुसऱ्या डावात चेतेश्वर पुजाराने आक्रमक खेळ करताना 81 धावांची चांगली खेळी केली होती. तसेच विराट आणि अजिंक्य रहाणेनेही दुसऱ्या डावात चांगला खेळ केला होता. त्यामुळे तेही मधल्या फळीत कायम राहण्याची शक्यता आहे.
यष्टीरक्षक – वृद्धिमान साहा
वृद्धिमान साहाला विशाखापट्टणमला झालेल्या कसोटीत फलंदाजीमध्ये खास काही करता आले नसले तरी तो दुसऱ्या कसोटीसाठी भारताच्या अंतिम 11 जणांच्या संघात यष्टीरक्षक म्हणून कायम राहण्याची शक्यता आहे.
भारताकडे रिषभ पंत यष्टीरक्षक म्हणून दुसरा पर्याय आहे पण तो मागील काही काळापासून फलंदाजी करताना संघर्ष करत असल्याने भारतीय संघ साहाला आणखी एक संधी देण्याची दाट शक्यता आहे.
अष्टपैलू – हनुमा विहारी, रविंद्र जडेजा, आर अश्विन
रविंद्र जडेजाने पहिल्या कसोटीत फलंदाजी तसेच गोलंदाजीत चांगली चमक दाखवली होती. त्याने या सामन्यात 70 धावा केल्या होत्या आणि 6 विकेट्स घेतल्या होत्या. तसेच अश्विननेही चांगली कामगिरी करताना 8 विकेट्स घेतल्या होत्या.
त्यामुळे फिरकी गोलंदाज आणि तळातील फलंदाज म्हणून आर अश्विन आणि जडेजा दुसऱ्या कसोटीसाठी अंतिम 11 जणांच्या संघात कायम राहण्याची शक्यता आहे.
तसेच हनुमा विहारीला जरी पहिल्या कसोटीत खास काही करता आले नसले तरी तो फिरकी गोलंदाज म्हणून एक पर्याय ठरु शकतो. तसेच जडेजा आणि अश्विनला त्याच्या गोलंदाजीचीही साथ मिळू शकते. तसेच तो फलंदाजीतही उपयोगी ठरु शकत असल्याने तोही दुसऱ्या कसोटीसाठी 11 जणांच्या भारतीय संघात असू शकतो.
वेगवान गोलंदाज – मोहम्मद शमी आणि इशांत शर्मा
मागील काही सामन्यांपासून भारताच्या वेगवान गोलंदाजांची कामगिरी चांगली झाली आहे. विशाखापट्टणमला झालेल्या पहिल्या कसोटीतही शमी आणि इशांतने चांगली गोलंदाजी केली होती.
शमीने या सामन्यात दुसऱ्या डावात सर्वाधिक 5 विकेट्सही घेतल्या होत्या. तसेच इशांतने या सामन्यात एकच विकेट घेतली असली तरी त्याची गोलंदाजी या सामन्यात चांगली झाली होती. त्यामुळे वेगवान गोलंदाज म्हणून शमी आणि इशांत दुसऱ्या कसोटीसाठीही कायम राहण्याची शक्यता आहे.