क्रोएशिया येथे सुरु असलेल्या नेमबाजी विश्वचषकात सोमवारी (२८ जून) भारतीय संघासाठी व समस्त देशासाठी आनंदाची बातमी आली. भारताची अनुभवी नेमबाज राही सरनोबत हिने २५ मीटर पिस्टल प्रकारात सुवर्णपदक पटकावत भारताला स्पर्धेतील आतापर्यंतचे सर्वात मोठे यश मिळवून दिले. याच प्रकारात भारताची युवा नेमबाज मनू भाकर सातव्या स्थानावर राहिली. राहीचे हे या स्पर्धेतील दुसरे पदक आहे.
राहीची सुवर्ण कामगिरी
भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणारी महाराष्ट्राची राही सरनोबत हिने नेमबाजी विश्वचषकातील आजचा दिवस आपल्या नावे केला. राही सरनोबतने पात्रता फेरीत ५९१ गुण मिळवत दुसरे स्थान पटकावत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. त्यानंतर अंतिम फेरीत तिने ३९ गुण नोंदवले.
अंतिम फेरीत तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या राउंडमध्ये पूर्ण गुण आपल्या नावे केले. फ्रान्सची मथिल्डे लामोले ही रौप्य पदक पटकावण्यात यशस्वी ठरली. भारताच्या मनू भाकरला आपली सर्वश्रेष्ठ कामगिरी नोंदवता आली नाही आणि ती सातव्या स्थानी राहिली. मनू भाकर पात्रता फेरीमध्ये तिसर्या स्थानी राहिली होती. या दोन्ही खेळाडूंनी यापूर्वीच टोकयो ऑलिंपिकसाठी पात्रता मिळविली आहे.
अशी राहिली आहे भारतीय संघाची कामगिरी
या स्पर्धेत भारतीय संघाने आत्तापर्यंत एक सुवर्ण, एक रौप्य आणि दोन कांस्य पदके जिंकली आहेत. मनू भाकर हिने सौरभ चौधरीसह १० मीटर एअर पिस्टल मिश्र प्रकारात रौप्यपदक जिंकले आहे. तर, राही सरनोबतने यशस्विनी देशवालसोबत १० मीटर एअर पिस्टलमध्ये कांस्यपदक आपल्या नावे केले. भारताला स्पर्धेतील पहिले पदक सौरव चौधरी याने कांसे पदकाच्या रूपाने १० मीटर एअर पिस्टल प्रकारात जिंकलेले. ऑलिंपिकपूर्वी भारतीय संघासाठी ही अखेरची आंतरराष्ट्रीय स्पर्धा असेल.
महत्वाच्या बातम्या:
म्हणून समालोचन करण्याचा घेतला निर्णय, दिनेश कार्तिकने खास पोस्टसह केला खुलासा
टेनिस चाहत्यांना मोठा झटका, ‘या’ स्टार खेळाडूची टोकियो ऑलम्पिकमधून माघार
सचिन तेंडूलकरनेही केले मान्य, WTC फायनलमध्ये टीम इंडियाची ‘या’ बाबतीत झाली चूक






