ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्न येथे झालेल्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात भारतीय संघाने ८ गडी राखून शानदार विजय मिळविला. तसेच या विजयासह ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. या विजयावर प्रतिक्रिया देताना भारताचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी भारतीय आणि जागतिक क्रिकेटच्या इतिहासातील एक संस्मरणीय पुनरागमन म्हणून या सामन्याकडे पाहिले जाईल, असे म्हंटले आहे. अॅडलेड कसोटीत ३६ धावांवर सर्वबाद झाल्यानंतर पुढील तीन दिवसात अशा पद्धतीने पुनरागमन करण्यात खेळाडूंची जिगरबाज वृत्ती दिसून येते, असेही शास्त्री यांनी नमूद केले.
पदार्पणवीरांनी केले प्रभावित
या सामन्यात भारताकडून शुबमन गिल आणि मोहम्मद सिराज यांनी आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. शास्त्री या दोघांच्याही कामगिरीने प्रभावित झाले आहेत. त्यांच्याबद्दल बोलताना शास्त्री म्हणाले, “दोन्ही पदार्पणवीरांनी दाखवलेली परिपक्वता आणि जिगरबाज वृत्ती याने मी प्रभावित झालो आहे. आज सिराजने टाकलेली गोलंदाजी अप्रतिम होती. त्याचे आकडे कदाचित त्याची कामगिरी योग्य रीतीने दर्शविणार नाहीत. परंतु, त्याचे नियंत्रण आणि मोठे स्पेल टाकण्याची क्षमता कौतुकास्पद आहे.”
शास्त्री यांनी प्रभारी कर्णधार अजिंक्य रहाणेचीही स्तुती केली. त्याच्या नेतृत्वाबद्दल बोलताना ते म्हणाले, “रहाणे एक चलाख कर्णधार आहे. त्याला खेळाची उत्तम जाण आहे. तो अतिशय उत्तम प्रकारे नेतृत्व करत असतो. त्याचा स्वभाव मुळातच शांत आहे. आणि त्याच्या या स्वभावामुळेच पदार्पण करणाऱ्या खेळाडूंना आणि गोलंदाजांनाही मदत झाली. कारण त्यांना दबावरहीत वातावरण मिळाले.”
रोहितला स्थान मिळणार का?
दुखापतीमुळे पहिल्या दोन कसोटी सामन्यांना मुकलेला भारताचा फलंदाज रोहित शर्मा तिसऱ्या कसोटीसाठी मात्र उपलब्ध असेल. अशावेळी त्याला संघात स्थान मिळेल का, असा प्रश्न विचारला असता शास्त्री म्हणाले, “आम्ही पाच गोलंदाजांसहच उतरू. रोहितच्या बाबतीत बोलायचे झाल्यास तो उद्या संघात सामील होईल. त्यांनतर आम्ही त्याच्याशी बोलून त्याच्या तंदुरुस्तीचा आढावा घेऊ. तो १४ दिवस विलगीकरणात होता, त्यामुळे त्याला काय वाटते आहे, हे आम्ही जाणून घेऊन निर्णय घेऊ.”
या मालिकेतील तिसरा कसोटी सामना ७ जानेवारीपासून खेळविण्यात येईल. हा सामना सिडनीच्या मैदानावर खेळवला जाण्याचे नियोजन असले तरी सिडनीत वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे हा सामना इतरत्र हलवला जाण्याची शक्यता आहे.
संबधित बातम्या:
– IND v AUS : दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलिया चारीमुंड्या चित! विजयासह भारताची मालिकेत १-१ ने बरोबरी
– साधं अर्धशतकही करता आलं नाही! तब्बल ३२ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाच्या बाबतीत घडलंय असं
– भारताची फिनिक्स पक्ष्याप्रमाणे राखेतून भरारी! जाणून घेऊ या मेलबर्न कसोटीतील संस्मरणीय विजयाची पंचसूत्री