अहमदाबाद। भारत विरुद्ध इंग्लंड संघात शनिवारी (२० मार्च) टी२० मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना झाला. नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताने इंग्लंडला ३६ धावांनी पराभूत करत ५ सामन्यांची टी२० मालिका ३-२ अशा फरकाने जिंकली.
भारताने इंग्लंडला २२५ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडला २० षटकात ८ बाद १८८ धावाच करता आल्या. इंग्लंडकडून जोस बटलर आणि डेव्हिड मलानने अर्धशतके केली. मात्र, अन्य फलंदाजांना फार काही करता आले नाही. भारताकडून शार्दुल ठाकूरने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तसेच भुवनेश्वर कुमारने २ विकेट्स घेतल्या. तसेच हार्दिक पंड्या आणि टी नटराजनने प्रत्येकी १ विकेट घेतली.
शार्दुल ठाकूरची कमाल
इंग्लंडने १२ व्या षटकापर्यंत सामन्यावर नियंत्रण ठेवले होते. मात्र १३ व्या षटकात जोस बटलरला भुवनेश्वर कुमारने ५२ धावांवर बाद केले. यानंतर मात्र इंग्लंडच्या नियमित अंतराने विकेट्स पडत राहिले. १५ व्या षटकात शार्दुल ठाकूरने बेअरस्टोला ७ धावांवर आणि ६८ धावांवर खेळणाऱ्या डेव्हिड मलानला बाद करत भारताला सामन्यात पुनरागमन करुन दिले. त्याच्या पुढच्याच षटकात इंग्लंडचा कर्णधार ओएन मॉर्गनला हार्दिक पंड्याने बाद केले. मॉर्गनचा झेल राखीव क्षेत्ररक्षक केएल राहुलने पकडला. त्यानंतर १९ व्या षटकात बेन स्टोक्सला १४ धावावंर टी नटराजनने बाद केले. तर जोफ्रा आर्चर १ धावेवर धावबाद झाला. २० व्या षटकात ख्रिस जॉर्डनला शार्दुल ठाकूरने ११ धावांवर बाद केले. अखेर सॅम करन १४ धावांवर नाबाद राहिला.
बटलर-रॉयची अर्धशतके
२२५ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचा सलामीवीर फलंदाज जेसन रॉय पहिल्याच षटकात शुन्यावर त्रिफळाजीत झाला. मात्र त्यानंतर जोस बटलर आणि डेव्हिड मलानने इंग्लंडची फलंदाजी सांभाळत पहिल्या १० षटकातच नाबाद शतकी भागीदारी रचली. या दोघांनीही भारताच्या प्रत्येक गोलंदाजाविरुद्ध आक्रमक फटके खेळले. तसेच ११ व्या षटकात टी नटराजन विरुद्ध खेळताना मलानने ३३ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. त्या पुढच्याच षटकात बटलरने ३० चेंडूत अर्धशतक पूर्ण केले.
इंग्लंडने १२ षटकात १ बाद १२७ धावा केल्या आहेत. सध्या बटलर २ चौकार आणि ४ षटकारांसह ५१ धावांवर आणि मलान ९ चौकार आणि २ षटकारांसह ६४ धावांवर खेळत आहे.
भारताचे इंग्लंडला २२५ धावांचे आव्हान
या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रण दिले. पण हा निर्णय भारतीय फलंदाजांनी चूकीचा ठरवत २० षटकात २ बाद २२४ धावा केल्या आणि इंग्लंडला २२५ धावांचे आव्हान दिले आहे.
भारताकडून विराट कोहली आणि रोहित शर्माने अर्धशतके केली. तर हार्दिक पंड्या आणि सुर्यकुमार यादवनेही आक्रमक खेळी करत आपले योगदान दिले. इंग्लंडकडून आदिल राशिद आणि बेन स्टोक्स यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
अखेरच्या ४ षटकात ५४ धावा
भारताने १६ षटकात १७० धावांचा टप्पा गाठल्यानंतरही विराट आणि हार्दिकने आक्रमक फलंदाजी चालू ठेवली. या दोघांनी अखेरच्या ४ षटकात मिळून ५४ धावा केल्या. अखेर विराट ५२ चेंडूत ७ चौकार आणि २ षटकारांसह ८० धावांवर नाबाद राहिला. तर हार्दिक १७ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारांसह ३९ धावांवर नाबाद राहिला.
रोहित-विराटचे अर्धशतक
भारताकडून ६ षटकांत ६० धावा करत रोहित शर्मा आणि विराट कोहलीने शानदार सालामी दिली. यानंतरही त्या दोघांनी आपला खेळ कायम ठेवला. दरम्यान ८ व्या षटकात रोहितने ३० चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये ५० पेक्षा अधिक धावांची खेळी करण्याची ही त्याची २६ वी वेळ आहे.
मात्र अर्धशतक केल्यानंतर तो ९ व्या षटकात ६४ धावांवर बाद झाला. त्याला बेन स्टोक्सने त्रिफळाचीत केले. या खेळीत त्याने ४ चौकार आणि ६ षटकार ठोकले. तो बाद झाल्यानंतर सुर्यकुमार यादवनेही खेळाची लय कायम ठेवत आक्रमक फलंदाजी केली. त्याने १० व्या षटकात आदिल राशिदला सलग २ षटकार मारले.
मात्र १४ व्या षटकात आदिल राशिदच्याच गोलंदाजीवर तो १७ चेंडूत ३२ धावा करुन बाद झाला. त्याला बाऊंड्री लाईनजवळ ख्रिस जॉर्डन आणि जेसन रॉयने मिळून अफलातून झेल घेतला. तो बाद झाल्यानंतर हार्दिक पंड्या फलंदाजीसाठी आला आहे.
यानंतर १६ व्या षटकात विराटनेही त्याचे अर्धशतक पूर्ण केले. आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये विराटचे हे २८ वे अर्धशतक आहे. त्याने ३६ चेंडूत त्याचे अर्धशतक पूर्ण केले.
भारताने १६ षटकात २ बाद १७० धावा केल्या आहेत. सध्या विराट ५१ धावांवर आणि हार्दिक १५ धावांवर खेळत आहे.
रोहित-विराटची दमदार सलामी
भारताकडून या सामन्यात कर्णधार आणि उपकर्णधार म्हणजेच विराट आणि रोहित हे सलामीला फलंदाजीसाठी उतरले. या मालिकेत खेळणारी ही भारताची चौथी सलामी जोडी आहे. या दोघांनीही पॉवर प्लेच्या ६ षटकांत आक्रमक फलंदाजी केली. या दोघांनीही ६ षटकांच्या आतच भारताला ५० धावांचा टप्पा ओलांडून दिला.
भारताने पॉवर प्लेमध्ये म्हणजेच ६ षटकांत बिनबाद धावा केल्या आहेत. सध्या विराट १५ चेंडूत १ चौकार १ षटकारासह १७ धावांवर आणि रोहित २१ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकारांसह ३५ धावांवर खेळत आहे.
इंग्लंडने जिंकली नाणेफेक
या सामन्यात इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यासाठी इंग्लंडने अंतिम ११ जणांच्या संघात कोणताही बदल केलेला नाही. त्यामुळे चौथ्या सामन्यात खेळलेला इंग्लंडचा संघच पाचव्या सामन्यातही खेळताना दिसणार आहे.
मात्र भारताने या सामन्यासाठी अंतिम ११ जणांच्या संघात १ बदल केला असून केएल राहुलच्या जागेवर टी नटराजनला संधी देण्यात आली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा भारताच्या सलामीच्या जोडीमध्ये बदल दिसून येणार आहे. गेल्या ५ सामन्यात सलामीच्या जोडीमध्ये हा चौथा बदल असेल.
असे आहेत ११ जणांचे संघ
भारत –
रोहित शर्मा, विराट कोहली (कर्णधार), सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या, शार्दुल ठाकुर, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, राहुल चहर, टी नटराजन.
इंग्लंड –
जेसन रॉय, जोस बटलर (यष्टीरक्षक), डेव्हिड मलान, जॉनी बेअरस्टो, ओएन मॉर्गन (कर्णधार), बेन स्टोक्स, सॅम करन, ख्रिस जॉर्डन, जोफ्रा आर्चर, आदिल राशिद, मार्क वुड.