मुंबई। भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात कसोटी मालिकेतील शुक्रवारपासून (३ डिसेंबर) सुरु झालेला दुसरा आणि अखेरचा सामना भारताने ३७२ धावांनी जिंकला. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्याच्या चौथ्याच दिवशी भारताने हा विजय मिळवत २ सामन्यांची मालिका १-० अशा फरकाने जिंकली.
चौथा दिवसाचा खेळ सुरु झाला तेव्हा विजयासाठी ५ विकेट्सची आणि न्यूझीलंडला ४०० धावांची गरज होती. मात्र, दिवसाच्या पहिल्या तासातच न्यूझीलंडने उर्वरित पाचही विकेट गमावल्या. त्यामुळे भारताने हा सामना सहज आपल्या नावावर करत मालिका जिंकली. या सामन्यात अखेरच्या डावात न्यूझीलंडसमोर भारताने ५४० धावांचे आव्हान ठेवले होते, पण न्यूझीलंडला सर्वाबाद १६७ धावात करता आल्या.
जंयतने गुंडाळली न्यूझीलंडची खालची फळी
चौथ्या दिवशी न्यूझीलंडने दुसऱ्या डावातील ४६ व्या षटकापासून आणि ५ बाद १४० धावांपासून पुढे खेळायला सुरुवात केली. न्यूझीलंडकडून तिसऱ्या दिवसाखेर नाबाद असलेल्या हेन्री निकोल्सने ३६ धावांपासून आणि रचिन रविंद्रने २ धावांपासून पुढे खेळण्यास सुरुवात केली.
पण, त्यांची जोडी फार काळ टिकली नाही. जयंत यादवने ५२ व्या षटकात रचिन रविंद्रला १८ धावांवर बाद केले. त्यानंतर जयंतने ५४ व्या षटकात काईल जेमिसन आणि टीम साऊथीला प्रत्येकी शुन्यावर माघारी धाडले. विल्यम सोमरविलने ५६ व्या षटकात जयंत यादवच्याच चेंडूवर विकेट गमावली. त्याचा उत्तम झेल मयंक अगरवालने टिपला. अखेर एकाकी झुंज देत असलेल्या हेन्री निकोल्सला ४४ धावांवर आर अश्विनच्या गोलंदाजीवर वृद्धिमान साहाने यष्टीचीत केले. त्यामुळे न्यूझीलंडचा दुसरा डाव ५६.३ षटकात १६७ धावांवर संपला.
न्यूझीलंडच्या या डावात डॅरिल मिशेलने ६० धावांची अर्धशतकी खेळी केली. होती. भारताकडून या डावात आर अश्विन आणि जयंत यादव यांनी प्रत्येकी ४ विकेट्स घेतल्या. तसेच अक्षर पटेलने १ विकेट घेतली.
सामन्याचा थोडक्यात आढावा
या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात सर्वबाद ३२५ धावा केल्या होत्या. या डावात मयंक अगरवालने सर्वाधिक १५० धावांची खेळी केली होती. तसेच अक्षर पटेलने ५२ धावांची खेळी केली होती. न्यूझीलंडकडून एजाज पटेलने सर्वाधिक १० विकेट्स घेतल्या होत्या.
त्यानंतर न्यूझीलंडचा पहिला डाव केवळ ६२ धावांत संपुष्टात आला. त्यामुळे भारताने २६३ धावांची आघाडी घेतली. या डावात न्यूझीलंडकडून काईल जेमिसनने सर्वाधिक १७ धावा केल्या. भारताकडून आर अश्विनने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या आणि मोहम्मद सिराजने ३ विकेट्स घेतल्या.
भारताने दुसरा डाव ७ बाद २७६ धावांवर घोषित केला आणि न्यूझीलंडसमोर ५४० धावांचे आव्हान ठेवले. या डावातही मयंक अगरवालने चांगली खेळी करताना ६२ धावांची खेळी केली. त्याच्याशिवाय चेतेश्वर पुजारा आणि शुबमन गिल यांनी प्रत्येकी ४७ धावांची खेळी केली. न्यूझीलंडकडून एजाज पटेलने ४ विकेट्स आणि रचिन रविंद्रने ३ विकेट्स घेतल्या.
न्यूझीलंडकडून ५४० धावांचा पाठलाग करताना डॅरिल मिशेलने अर्धशतकी खेळी करत झुंज दिली. त्याला हेन्री निकोल्सची साथ मिळाली. मात्र, अन्य कोणत्याही फलंदाजाला खास काही करता आले नसल्याने न्यूझीलंडचा दुसरा डाव १६७ धावांत संपुष्टात आला.