INDW vs ENGW: बर्मिंगहॅम येथील एजबॅस्टन येथे खेळल्या गेलेल्या पाचव्या टी20 सामन्यात टीम इंडियाला 5 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. तरीही, टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध 5 सामन्यांची टी-20 मालिका 3-2 अशी जिंकली. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी केल्यानंतर, भारतीय महिला संघाने निर्धारित 20 षटकांत 7 विकेट्स गमावून 167 धावा केल्या. भारताकडून सलामीवीर शेफाली वर्माने शानदार अर्धशतकी खेळी खेळली.
भारतीय संघाच्या धावसंख्येला प्रत्युत्तर म्हणून इंग्लंडने शेवटच्या चेंडूवर 5 विकेट्स गमावून 168 धावांचे लक्ष्य गाठले. या सामन्यात, इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाने टी-20 मध्ये त्यांचा तिसरा सर्वात मोठा यशस्वी धावांचा पाठलाग केला. इंग्लंडकडून सोफिया डंकले आणि डॅनिएल व्याट-हॉज या सलामी जोडीने शानदार कामगिरी केली. सोफिया डंकलीने 46 धावांची खेळी केली तर डॅनिएल वायटने 56 धावा केल्या. याशिवाय, कर्णधार टॅमी ब्यूमोंटने 30 धावांचे योगदान दिले. 3 विकेट्स घेणाऱ्या चार्लोट डीनला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
भारतीय संघाने आधीच चौथा सामना जिंकून टी20 मालिका जिंकली पण मालिका विजयाने संपवू शकला नाही. असे असूनही, भारतीय महिला क्रिकेट संघाने पहिल्यांदाच इंग्लंडविरुद्ध टी20 मालिका जिंकण्यात यश मिळवले.
भारताने 2006 मध्ये डर्बी येथे खेळल्या गेलेल्या एकमेव टी20 सामन्यात इंग्लंडचा पराभव केला. तेव्हापासून, भारतीय संघाने इंग्लंडविरुद्ध मायदेशात आणि परदेशी भूमीवर कधीही टी20 मालिका जिंकली नव्हती. परंतु, यावेळी टीम इंडियाने मागील अपयश विसरून प्रथमच टी20 मालिका जिंकली. 20 वर्षीय श्री चरणीची मालिकावीर म्हणून निवड झाली. श्री चरणीने पदार्पणाच्या मालिकेत 5 सामन्यांमध्ये 10 बळी घेण्याचा पराक्रम केला. टी-20 मालिका जिंकल्यानंतर, टीम इंडिया आता यजमान इंग्लंडविरुद्ध 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत सहभागी होईल, जी 16 जुलैपासून सुरू होईल.






